Saturday, August 23, 2014

मोहन भागवताचे “अविवेकी” भागवत पुराण

मोदी सरकार सत्तेवर येताच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे फारच उत्साहित झालेले दिसतात. मोदी सरकारच्या येत्या पाच वर्षाचा काळात “संपूर्ण भागवत पुराण” लिहिण्याची त्यांना  फार घाई झालेली दिसते. त्याचाच भाग म्हणून पुराणांवर आधारित भारताचा नवा इतिहास लिहिण्याचे आदेश त्यांनी आपल्या संघीय इतिहासकारांना दिलेले आहेत. जगातील संपूर्ण धर्मांना गिळंकृत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही त्यांनी अलीकडेच मारली असून या देशाचे नाव भारत असणे हे त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या देशातील सर्व जनता ही हिंदू असून त्यांनी
स्वत:ला हिंदुस्थानी म्हटले पाहिजे असे जबरदस्तीवजा आवाहन त्यांनी केले आहे. तर हिंदू व्यतिरिक्त  इतरांना ते दुय्यम दर्जाचे नागरिक समजतात.
मोहन भागवताचे वरील आवाहन हे पूर्णत: संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये “हिंदुस्थान” या शब्दाला कोणतेही स्थान देण्यात आले नाही. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये स्पष्ट करण्यात आले की, या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याचा संघ असेल. याच अनुछेदात (२) (३) मध्ये राज्यांची राज्यक्षेत्रे संपादित केली जातील अशी राज्यक्षेत्रे यांचे मिळून भारताचे राज्यक्षेत्र बनते असेही स्पष्ट केले आहे. तसेच संविधानाच्या उद्देशिकेमध्ये “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य” असे नमूद केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या देशाचे नाव इंडिया वा भारत असे असताना मोहन भागवत हे या देशाला हिंदुस्थान संबोधण्याचे आवाहन करतात. हा या देशाच्या घटनाद्रोहाबरोबरच राष्ट्रद्रोह ठरतो. परंतु या देशाच्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणताही आरोप ठेवला नाही. या उलट शासन त्यांना  सन्मानाने वागवीत आहे. परंतु अरुंधती राय, डाक्टर सेन यांच्यावर प्रशासनाकडून पटकन राष्ट्राद्रोहाचे आरोप लावले जातात. त्यामुळे आजच्या सरकारची स्पष्ट दिशा काय आहे? हे सांगण्यासाठी कोणा गोसाव्याची गरज नाही. संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीला मानणारा मिडिया “भारत” या शब्दाऐवजी “हिंदुस्थान” या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भाग आहे असे मानायला पाहिजे.

मोहन भागवताचा प्रिय शब्द हिंदूया शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून “हिंदू” शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतातthe word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. 

भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात हिंदूहा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. तो कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही.  मुस्लीम आक्रमणानंतर “हिंदू” या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात “हिंदुवाद” हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला हिंदूहा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे. या धर्माला ना धर्मंसंस्थापक आहे ना त्याचा कोणताही धर्मग्रंथ. तरीही हा शब्द बहुजनाच्या मस्तकात टाकण्याची जबरदस्ती मोहन भागवतीय प्रवृत्ती करीत आहे. हा संघीय षडयंत्राचा भाग आहे.
हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येकाला हिंदू का म्हटले जात नाही, असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱयांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱयांना जर्मन, अमेरिकेत राहणाऱयांना अमेरिकन म्हटले जाण्याचा तर्क दिला आहे. याच तर्काने भारतात राहणा-यांना भारतीय असे संबोधण्यात येत असते. याचे ज्ञान भागवताना नाही काय?. गुलामीदर्शक  “हिंदुस्थान” हा शब्द या देशातील बहुजनांना मान्य नाही. तरीही भागवती प्रवृत्ती “हिंदू व हिंदुस्थानीचे” गीत गातात. या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचे व त्याआडून भारतीयावर सनातन धर्मीय “चातुर्वर्णीय व्यवस्था” लादायची हा संघानितीचा एक भाग आहे.
जगातील सर्व धर्मांना गीळकृंत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही भागवताने मारली. त्यांच्या या दर्पोक्तीमध्ये कसलेही तथ्य नाही. या देशाच्या भौगोलिक परिस्थितिमूळे अरबांनी इंदू/सिंधू नदीच्या पलीकडील सर्व लोकांना हिंदू म्हटले. आणि त्यामुळेच नदी पलीकडे वास्तव्य करणा-या येथील विविध समुदायाच्या लोकांना विशेषत: जैन व बौद्धांना हिंदू लेबल आपोआप लावल्या गेले. फार मागे न जाता स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला तर या देशात कोणत्याही मुस्लीम वा ख्रिश्चन वा बौध्द समुहाने हिंदू धर्म स्वीकारला नाही. याउलट लाखो हिंदूचे मुस्लीम, ख्रिश्चन तसेच बौध्द धर्मात धर्मांतरण झालेले बघायला मिळते. हे धर्मांतरण स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी झालेले दिसते. जातीभेद, विषमता, अन्याय व अपमान या दलदलीतून निघून मुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतरण  होय. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कैचीत आदिवासी (आदिम धर्म) सापडलेला दिसतो. हिंदुत्ववादी आदिवासींना “वनवासी” म्हणून संबोधत असतात. त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या “घरवापसीचा नारा” संघांनी दिला. आदिवासीचे हिंदुकरण करण्याच्या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडून आपली मूळ संस्कृती नष्ट करून घेत आहे. याच आदिवासीचे हिंदूकरण करणारे मात्र सरकार व खाजगी कंपन्या जल, जंगल  जमीन हिसकावून त्यांना जंगलाबाहेर हाकलून देत आहे. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्राथमिक गरजा आदिवासी ज्या जंगलातून पूर्ण करतात त्याच जंगलाच्या बाहेर त्यांना काढण्यात येत आहे.  त्याविरोधात मात्र “ब्र” शब्दही काढीत नाही. यावरून संघाला आदिवासीच्या जीवनासी, त्याच्या भूकेशी काही देणेघेणे नाही तर त्यांना केवळ हिंदूची लोकसंख्या फुगन्यासी सबंध आहे.
मोहन भागवताच्या संघाने या देशाचा इतिहास बदलविण्याचा घाट घातला आहे. गुजरात ही त्यांची प्रयोगशाळा आहे. बालसंस्काराच्या नावाखाली पौराणिक काल्पनिक मिथ हे इतिहास म्हणून कोवळया मनावर बिंबविण्याचा प्रयत्न हा सत्य लपवून ठेवण्याचा अघोरी उपाय होय. रामायण, महाभारतातील कपटी कारस्थाने, महिलावर झालेली चिखलफेक, ब्राम्हणी सामाजिक व्यवस्था, ब्राम्हण वर्गाचे समाजावरचे नियंत्रण व इतरांच्या धर्माचा द्वेष हे विषय शिकवून संघाला (अ)विवेकी समाज निर्माण करून आस्थेला सर्वोच्च स्थान देवून डोके हलविणारी विजय भटकरादी पिढी निर्माण करायची आहे काय?     
विवेकवाद हा 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा असतो. विवेकवादाच्या वाटचालीतील महत्वाचे धोरण म्हणजे समाजाचा मनात समतेचे, एकतेचे, विज्ञानवृत्तीचे रोपण करने हे असते. आस्तिक व नास्तिक या वादात न पडता सहयोगी अस्तित्वावाराचा दृढविश्वास व त्यावरची वाटचाल. मोहन भागवताना “विवेक व विवेकवाद” या शब्दाची फार अलर्जी असावी. त्यामुळेच त्यांच्या मनात  “अविवेकी विध्वंसाची” पुनरुक्ती नेहमी नेहमी होत असावी. कारण विवेकशून्य माणसेच समाजात व माणसामाणसात विषवल्लीचे रोपण करीत असतात. अशा लोकांना शांतता, विश्वास व सहजीवन नकोसेच असते. तर त्यांना हवी असते अंधश्रद्धा, द्वेषावर आधारित समाजपद्धती व मानसिक दृष्ट्या पाया पडणारी पंगु पिढी. ती निर्माण करण्यासाठी भागवत व त्यांचे संघीय सैनिक आपली सारी हयात घालवीत आहेत. ज्यांना समाजाने शहाणे होवूच नये, त्याने उलट प्रश्न करूच नये असे वाटते तो धुर्तांचा वैमानिक असतो. त्यांचा तर्क व न्याय यावर विश्वासच नसतो. मोहन भागवत व त्याचा संघ आज अशा धुर्तांची भूमिका वटवीत आहे. या अविवेकी “भागवत पुराणाचा” उधळणारा चौखूर वेळेत रोखला नाही तर विनाशाशिवाय दुसरे काहीही हाताला लागणार नाही याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

बापू राऊत

९२२४३४३४६४

3 comments:

  1. u r mentaly disturbed.

    ReplyDelete
  2. u need treant at Pune - Yerwada Mental Hospital, go immidetly, its free.

    ReplyDelete
  3. punyavun nagarla jatana saravadi made thamba, tithe misalpav mast milto, ekda try kara.

    ReplyDelete