Monday, February 9, 2015

गांधीजीच्या विचारांची रस्सीखेच

गांधीजीला अनेकांनी वेगवेगळया भिंगाच्या चष्म्यातून  बघितले आहे. महात्मा गांधी यांना कांग्रेस पक्ष, सर्वोदयी व सोईच्या व्यवस्थापुरक मनसबदारानी विश्वपुरुष केले आहे. गांधींच्या महान अशा अहिंसक सत्याग्रहाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा सर्वोदयी, काग्रेस व त्यांच्या विचाराचा ज्या संस्कृतीला फायदा पोहोचत होता अशांनी गांधीजींची अधिकच स्तुती केली. परंतु बदलेली जागतिक परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेला ब्रिटन, अॅटली या उदारमतवाद्याचे आलेले सरकार व स्वातंत्र्यविरांमुळे हादरलेले ब्रिटीश या मुद्यांचा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मोठे योगदान होते याचाही विचार व्हायला हवा. समाजवाद्याबरोबर आता मोदीही गांधींच्या रंगात रंगू लागले आहेत.

Saturday, February 7, 2015

स्वाभिमानी व साहसी जीतनराज मांझी

महाराष्ट्रातील व इतर राज्यातील दलित जनतेने आजपर्यंत मायावती वगळता अनेक स्वार्थी दलित नेत्यांचे पायचाटू, लालची व समाजाची फसवणूक करणारे राजकारण बघितले आहे. जनतेला स्वार्थासाठी आपले इमान विकणारे दलित नेते बघण्याची सवयच झाली होती. परंतु याला आता छेद गेलाय. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आपण कोणाचाही रबरस्टांप नसल्याचे दाखवून दिले. दलितांचे कान पकडून कोठेही बसवून ठेवण्याची सवय लागलेल्या प्रस्थापित वर्णवादी सवर्ण नेत्यासाठी हा मोठा झटका असून यातून आमचे इतर दलित नेते धडा घेतील की नाही? हा मोठा प्रश्नच आहे. रामदास आठवले, रामविलास पासवान व उदित राज हे या लालची व स्वार्थी नेत्यांना आपले नेते
म्हणून जनतेने कधीच नाकारले. मुख्यमंत्री मांझी प्रशासन व सत्ता राबविण्यात कितपत यशस्वी झाले? हा वादाचा विषय असला तरी आज त्याची चर्चा करण्याची गरज नाही. कारण मुख्यमंत्री मांझीना योग्य प्रकारे प्रशासन करू न देण्याची त्यांच्याच मंत्रिमंडळातील सवर्ण नेत्यांनी पण केला होता.
सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामान्य दलितांची मान उंच व्हावी याच प्रवर्गातील मांझी यांची कृती आहे. त्यांच्या कृत्याने दलितांना एक बळ प्राप्त झाले असून वेळ आल्यास तो आपला इंगाही दाखवू शकतो हे मांझीने दाखवून दिले आहे. मुख्य प्रवाहातील नेत्यांना दलीत हे केवळ वापरून फेकण्यासाठीच असतात हा आजवरचा भ्रम एकदाचा तुटला हे बरेच झाले. राजकारणातील मग ते नितीशकुमार असो वा लालूप्रसाद वा सोनिया गांधी असो वा मोदी. आम्हाला भीक नको, अधिकार हवेत याचा आजचा आवाज म्हणजे जीतनराम मांझी होत. बिहारमध्ये मांझी एकटे नाहीत सारा दलित समाज त्यांच्यापाठीमागे उभा राहील कारण आज ते सामान्य दलितांचा आवाज बनले आहेत. जीतनराम हे बामसेफी विचारातून बनलेले नेते आहेत. त्यांच्याप्रमाणेच वेस्ट बंगाल मधील एक खासदार संसदेत हिंदू वर्णव्यवस्थेवर तुटून पडत असल्याचे दिसते. यावरून भविष्यात दलित चळवळीला स्वाभिमानी नेते मिळू शकतील असा आशावाद निर्माण झालाय.

बापू राऊत

९२२४३४३४६४