Friday, May 13, 2016

तृप्ती देसाई यांचे आंदोलन व काही अनुत्तरीत प्रश्न

भारतात हिंदू धर्मातील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला होणारा विरोध हि काही नवीन बाब नाही. वेद काळापासून सुरु झालेले मानवी अवमूल्यन व्हाया पुराणे ते मनुस्मृतीच्या काळापर्यंत अधिक वेगाने झाले. मनुने आपले स्वत:चे कडक कायदे बनवून समाजव्यवस्थेवर बळजबरीने लादले. वेद, पुराणे व स्मुर्त्याचा धर्मशास्त्रे म्हणून गौरव करण्यात आला. या वैदिक धर्मशास्त्रानुसार (आता हिंदू धर्म व त्याची धर्मशास्त्रे असे नामकरण) स्त्रियाना अस्पृश्य, विटाळलेल्या व खालच्या दर्जाच्या मानल्या गेल्या. त्यांच्या स्पर्शाने देव व मंदिरांचे भंजन होते. देव बाटतात म्हणून स्त्रियांना हजारो वर्षापासून मंदिर प्रवेश व शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले होते. काळ बदलला, मनुस्मृती बाद होवून भारतीय राज्यघटनेचे कायदे लागू झाले तरीही धर्माचा धंदा करणाऱ्यांनी स्वत:ला त्या कुजक्या  धर्मशास्त्राच्या पानातच बंदिस्त करून ठेवल्याचे दिसते.

या धर्मशास्त्राच्या पानात काय दडलेले आहे? पुरुषा बरोबरीचे हक्क, सन्मान, प्रतिष्ठा  व स्वाभिमान या बाबत हि धर्मग्रंथे काय म्हणतात? या संदर्भात भारतीय स्त्रियांनी गंभीरतेने कधीही बघितले नाही. स्वत:च अपमानित होणाऱ्या परंपरांना तिने सतत आपल्या डोक्यावर घेवून काटेकोरपणे पालन केले आहे. आपण आज जे काही शिकतो त्या शिक्षणाचा अधिकार आपल्याला कोणी मिळवून दिला? याचेही तिला भान नाही एवढी ती अनभिज्ञ आहे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्रि हक्क्साठी आपले उभे आयुष्य वेचले ती सावित्रीबाई फुले कोण? हेही तिला माहित नाही. परंतु ज्यांचा आपल्या उध्दारासी कसलाही सुतराम सबंध नाही अशी तंबोरा हातात घेतलेली सरस्वती व पुराणातील सावित्रीला ती बरोबर लक्षात ठेवत असते.

अल्पशा प्रमाणात का होईना आज समाजातील काही मोजक्या स्त्रियांमध्ये स्व:त्वाचे भान जागृत झाले असून आपला सन्मान व स्वाभिमानाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. महाराष्ट्रात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईने शनी शिंगणापूर व त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन उभे केले. तिने केलेल्या आंदोलनाला धर्माच्या ठेकेदारांनी केराची टोपली दाखविली होती परंतु भारतीय घटनेने दिलेल्या स्त्रि-पुरुष समान अधिकाराच्या मुद्द्यावर न्यायालयानी दिलेल्या निर्णयामुळे महिलांचा मंदिर प्रवेश शक्य झाला.

मंदिर प्रवेशाला मिळालेल्या यशानंतर तृप्ती देसाई व तिच्या भूमाता ब्रिगेडने स्त्रियांचे धार्मिक अधिकार व प्रत्यक्ष व्यवहारातील तिचे स्थान यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वैदिक (हिंदू) धर्मात शंकराचार्यांची चार पीठे महत्वाची व सर्वोच्च गणली जातात. शंकराचार्याच्या या पिठावर असलेल्या पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देत स्त्रियांच्या धार्मिक भागीदारीचा प्रश्न घेवून शंकराचार्याचे काही पीठ स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची मागणी देसाई करतील काय? तृप्ती देसाईसाठी महत्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे, देशात साधूचा वेश धारण केलेल्या नंग्या व विभित्स साधूना कुंभ व सिहस्थ मेळाव्या सारख्या धार्मिक महोत्सवात फिरण्यास बंदी घालण्याची मागणी समोर रेटली पाहिजे. हे नागडे साधू कुंभ व सिहस्थ मेळ्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त फिरत असतात. धर्मभोळ्या स्त्रिया या नागड्या साधूच्या दर्शनासाठी रांगा लावतात. हे नंगे साधू स्त्रियांकडे बघत अश्लीलतेचे हावभाव करीत असतात. हे विभित्स प्रकार रोखण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांनी व न्यायव्यवस्थेने घेतली पाहिजे. संस्कृतीचे रखवालदार म्हणून ठेका घेणारे काही संघीय संस्थेचे कार्यकर्ते बगिच्यामध्ये एकत्र बसलेल्या तरुण तरुणींना तसेच एखाद्या तरुणीने शरीरावर तोकडे कपडे घातल्यास हे संस्कृती रखवालदार त्यांची नानाप्रकारे बदनामी करून मारहाणही करीत असतात. मात्र संस्कृतीच्या ह्याच ठेकेदाराना कुंभ व सिहस्थ मेळाव्यातील नंग्या साधूंचे वागणे भूषणावह वाटत असते. अशा उफराट्या विचाराचा महिला संघटनाकडून विरोध होणे फार गरजेचे आहे.

स्मुर्त्या आणि अनेक पुराणामध्ये स्त्रियांच्या बदनामीचे दाखले बघावयास मिळतात. मनुस्मृतीमध्ये स्त्रीसबंधात अनेक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मनूचा कायदा पुरुषांना स्त्रीसी बध्द करीत नाही तर स्त्रीला पुरुषाशी बध्द करून माणसाला मुक्त करतो. रामायण व महाभारत या ग्रंथामध्येही सीता, शूर्पणखा आणि द्रोपदी यांच्यासारख्या स्त्रियांना पुरुषाकडून फार अपमान सहन करावा लागला. त्यामुळे रामायण महाभारतासारखी काव्ये स्त्रीयासाठी भूषण कशी ठरू शकतात? कधीकाळी संधीसाधुच्या टोळीने धर्मशास्त्राचे लिखाण करून स्त्रियांना जायबंदी करून टाकले. त्यामुळे अशा धर्मशास्त्राचे काय करायचे?. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. त्यामुळे ज्या स्मुर्त्या व  धर्मशास्त्रे स्त्रियांना हीन लेखतात अश्या शास्त्रासंदर्भात तृप्ती देसाई व तिच्या ब्रिगेडची जाहीर भूमिका काय आहे ? हे अजूनही स्पष्ट नाही.

तृप्ती देसाईने आता आपला मोर्चा हाजीअली दर्गा प्रवेश व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या नेमणुका संदर्भातील प्रश्न हाती घेतल्याचे दिसते. तृप्ती देसाई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या नेमणुका संदर्भातील मागणीचा प्रश्न उभा करून आपल्याच मुळ आंदोलनाच्या दिशेला भरकटविण्याचे प्रयत्न करीत  असल्याचे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशातील सलोख्याचे वातावरण दुषित करण्याचा आरोप होत आहेत. देशात असहिष्णुता व भीतीचे वातावरण निर्माण करण्यास संघाच्या अनेक शाखा कारणीभूत आहेत. हिंदू राष्ट्रावादाच्या नावावर भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणणारा संघ तसेच अंधश्रद्धा व वाईट चालीरीतीवर भाष्य न करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तृप्ती देसाईला गौरवास्पद वाटतो काय?. दुर्गावाहिनी सारखी शस्त्रधारी महिला संघटना हि संघाच्या अनेक शाखांपैकी एक आहे. अशा शस्त्रधारी दुर्गावाहीनीला आपली मान्यता आहे काय?. संघ हि नोंदणीकृत संघटना नसताना अशा संघटनेमध्ये महिलांचा समावेश आपल्याला महत्वाचा का वाटतो? सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या तृप्ती देसाई वा भूमाता ब्रिगेड कडून अशा प्रश्नाचे स्पष्टीकरण यायला हवेत. 

आंदोलन कोणतेही असो, त्यात भूमिका ठाम असली पाहिजे. त्या भूमिकेचे तत्वात रूपांतरण झाले पाहिजे तरच अशा आंदोलनाला इतिहासात स्थान मिळत असते. तृप्ती देसाई व तिच्या भूमाता ब्रिगेडचे आंदोलन हा केवळ स्टंटबाजीचा नमूना ठरू नये. बहुतेकदा अशी आंदोलने म्हणजे राजकारणात शिरण्याच्या पायऱ्या असतात. खमंग प्रसिद्धी घेवून राजकारणात जायचे असेल तर अशी आंदोलने करीत स्त्रियाना धार्मिक व अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलुन गुलामी पत्त्कारायला लावणार असाल तर हि शुध्द फसवणूक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी व काळाराम मंदिर प्रवेशासाठी चळवळी केल्या. परंतु ह्या चळवळी प्रतीकात्मक होत्या. माणूस म्हणून तुम्हाला जे हक्क आहेत ते आम्हालाही का मिळू नये? यासाठी ते आंदोलन होते. मंदिर वा धार्मिक कार्यात गुंतवून ठेवण्यासाठी नव्हे. सनातन्यांना इशारा देत बाबासाहेब म्हणाले होते, “तुम्ही मंदिराची दारे उघडावीत वा उघडू नये हा तुमचा प्रश्न आहे. यासाठी मी आंदोलन करावे असे मला मुळातच वाटत नाही. पवित्र मानवी मुल्ये जपणे आणि मानवतेचा सन्मान करणे हीच माणुसकी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मंदिराची दारे उघडा आणि तुम्हीच माणूस आहात याचा पुरावा द्या. माणूस होण्यापेक्षा हिंदू होणे आपणास महत्वाचे वाटत असेल तर मंदिराची दारे बंद ठेवा आणि खड्ड्यात जा. त्याची चिंता मी का करावी? अशा ठिकाणी येण्याची मी पर्वाच करीत नाही”. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई व तिच्या भूमाता ब्रिगेडने अनेकांच्या शंकेचे निरसन केले पाहिजे.

आपले आंदोलन हे स्त्रीदास्य मुक्तीचे आहे कि स्त्रीला कर्मकांडात भिजविणारे? विवेकवादी कि सनातनी? विज्ञानवादी कि धर्मवादी? तर्कवादी कि कर्मकांडी? बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या वरील भूमिकेचा स्वीकार की नकार? ह्या प्रश्नांची उत्तरे साहजिकच तृप्ती देसाई कडून अपेक्षित आहेत. प्रसिद्धीच्या स्टंटसाठी देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला विवेकवाद, सद्सदविवेकबुद्धी व नैसर्गिक वास्तवाच्या मार्गावरून हटवून धर्मांधता व श्रद्धेच्या नावाने चालणाऱ्या अंधश्रध्देच्या कारखान्यात ढकलण्याचे कार्य होत असेल तर त्यांचा अंत हा शेखचिल्लीच्या कथेसारखा होतो हेही आंदोलनकर्त्याने लक्षात ठेवावयास पाहिजे.

   
बापू राऊत

९२२४३४३४६४
E mail:bapumraut@gmail.com

5 comments:

  1. amerikan chopsy khanar ka re?

    ReplyDelete
  2. Indonesian nuddles pan khashil ka re bapu?

    ReplyDelete
  3. Bapu, Mexican chat khanr ka tu?

    ReplyDelete
  4. ekhadi chatugiri chi comment asel tar lagech hujregri suru karto comment la replay deto ani hya comment cha manus tula khanyabaddal vivharto tar gappa bastos.

    ReplyDelete
  5. Aajkal hindu dharma kasa vait aahe aahe ani maza dharma kasa changla aahe ase blog lihanre tinpat lekhak gallogalli bhuchatrasarkhe ugavale aahet.
    Ha pan tyatla ekach.

    ReplyDelete