Saturday, August 15, 2020

बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य कसे ? भाग २ (उत्तरार्ध)

टिळक, मी सुधारणांना पाठींबा दिल्यास माझ्या सार्वजनिक कार्यास बाधा येईल असे म्हणत. कधी सुधारणेस संख्येची अट घालत व नंतर त्यास नकार देत.  परधर्मीय व विदेशी मॅक्सम्युलरने वेद वाचले ते टिळकांना व त्यांच्या कर्मठ धर्मांधाना कसे चालले? पण तेच वेद आपल्याच ब्राह्मणेत्तर हिंदूनी वाचू नये आणि वेदांद्वारे संस्कार करण्याचा हक्क त्यांनी मागू नये असे म्हणणार्‍या टिळकांची नीती दोगलेपणाची असून ती आपल्याच हिंदू लोकाविरोधी होती. 

कायदेमंडळात जावून कुणब्याने नांगर हाकावयाचे नाहीत किंवा वाण्यांनी तागड्या धरावयाच्या नाहीत असे म्हणनार्‍या टिळकांनी सदैव तेल्यातांबोळ्याचे व शेतकर्‍यांचे नुकसान केले. त्यांना अशिक्षित व अज्ञानात ठेवून केवळ आपले पाठीराखे बनविले. पण याच तेलीतांबोळी व शेतकर्‍यांनी टिळकांच्या अथनीच्या सभेतील असभ्य वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील सभा उधळून लावल्या होत्या. अहोरात्र कष्ट करून व अज्ञानी राहून अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍यास शूद्र व कुणबट असे कुत्सितपणे संबोधणारे टिळक, गरिबी व शोषणामुळे सावकारांचे कर्ज फेडू न शकणार्‍या आपल्याच शेतकरी बांधवांना कारावासात पाठवा असे ब्रिटीशास सांगणारी व्यक्ति देशभक्त तरी कशी ठरू शकते? या विवेचनानुसार टिळकांचे स्थान कोठे असावे हे ज्यांनी त्यांनी आपल्या वैचारिक कुवतीनुसारच ठरविलेले बरे.

Saturday, August 8, 2020

बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य कसे ? भाग १

 

टिळकांचा १९१६-१९१९ हाच काळ थोड्याफार राजकीय प्रभावाचा होता. होमरूल लीग (१९१६), गोखलेंच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसमध्ये पुनर्प्रवेश (१९१५) व लखनौ करार. ह्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. वस्तूत: या करारातील मसुदा नामदार गोखलेनी १७ फेब्रुवारी १९१५ ला तयार केला होता. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचे देहावसान झाले. त्यामुळे या मसुद्याला गोखलेचे राजकीय मृत्यूपत्र अशीही  संज्ञा दिली गेली. टिळकांनी मान्य केलेल्या लखनौ ठरावातील मुद्दे व करारातील बाबी त्यांचे कट्टरभक्त असलेल्या बाळकृष्ण मुंजे, देशपांडे, अणे आणि एन.सी. केळकर यांना पसंत नव्हते तसेच मदनमोहन मालविय व वाय.सी.चिंतामणी या मवाळांनाही मान्य नव्हत्या. हिंदू सभावाल्यांनी तर टिळकांवर आपला रोष व्यक्त केला होता.

 

टिळकांनी आपल्या हयातभर सुधारकांची बदनामी व त्यांच्या कार्यावर टीका करण्यात आपली शक्ति व वेळ खर्च केला. गोपाळकृष्ण गोखले, न्या. रानडेवर व अन्य कॉंग्रेस नेत्यावरील अनिष्ट टीकेमुळे ते कॉंग्रेस पासून दूर फेकल्या गेले होते. संमतीवयाचे विरोधक व कर्मठांचे पाठीराखे अशी त्यांची प्रतिमा बनल्याकारणाने कामगारवर्ग त्यांच्याकडे कामगार पुढारी म्हणून नव्हे तर ब्राह्मण पुढारी म्हणूनच पाहत असत. मुंबई पुण्याच्या श्रमिक वर्गात सत्यशोधक समाजाचे वर्चस्व होते. त्यामुळे कामगारवर्ग दुसर्‍या राजद्रोहापर्यंत त्यांच्याशी अनुकूल नव्हता. पहिल्या आंतर्राष्ट्रीय कामगार परिषदेसाठी (ऑक्टोबर १९१९) भारतीय कामगारांचे प्रतींनिधी म्हणून काही पुढार्‍यांनी पुढे केलेल्या टिळकांच्या नावाला कामगार हितवर्धक सभेने विरोध केला होता. तर १९२० च्या वॉशिंग्टन मधील लेबर कॉंग्रेससाठीचा सहभागही कामगार संघटनाच्या विरोधामुळे त्यांना सोडावा लागला होता.

 

टिळक १८८९ ला कॉंग्रेसच्या दख्खन शाखेचे सचिव होते पण कर्मठ ब्राह्मणांचे पुढारी अशीच त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात त्यांच्या भांडखोर व जहाल स्वभावामुळे कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळू शकले नाही. १९१४ साली मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतरही सर्वसमावेशक भूमिका न घेता ब्राह्मण समाजाच्या हितांचे प्रश्न व कर्मठ विचारासोबतच सबंधित राहिले. चिरोल प्रकरणामुळे त्यांची विदेशात व भारतातही पुरती नाचक्की झाली होती. कट्टर समर्थक असलेल्या अनुयायांनी त्यांच्या हयातीमध्येच आपल्या निष्ठा बदलत गांधी गटात पळापळ करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर, दिवसेंदिवस गांधीच्या  वाढत्या प्रभावामुळे येथे कामच नाही तर रहा तरी कशाला यांनी अशी नामुष्की स्वत:स वाटून वर्ष दीड वर्ष विलायतेस जावून राहण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या टिळकांना “लोकमान्य” ही बिरुदावली खरेच शोभून दिसेल काय? याचाही विचार व्हावयास हवा.? (संदर्भ: टिळकांचे पाठीराखे परंतु नंतर गांधी गोटात गेलेले कृष्णाजी खाडीलकर यांच्या सोबत झालेला वार्तालाप )