Wednesday, June 7, 2023

बहुजनवादी राजकारणाचे अपयश व आजची अपरिहार्यता

बहुजनवाद हा भारतातील उपेक्षित समुदाय, विशेषत: दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांना सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रणालीगत होत असलेला अन्याय, असमानता आणि दडपशाही विरोधात संयुक्तपणे लढा देण्याची प्रणाली होय. बहुजनवादाची उद्दिष्टे या समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक संधी आणि सामाजिक न्यायाद्वारे सशक्त करणारी असून उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आहेत. तथापि, याची उदात्त ध्येये असूनही त्याला अनेक आव्हाने आणि मर्यादांचा सामना करावा लागत आहे. बहुजन समाज लोकसंख्येने मोठा असला तरी सांस्कृतिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या तो वंचित आहे. याचे कारण त्यांनी मान्य केलेली  धर्मशास्त्रीय व पुरोहितशाहीची चौकट होय. यातून निर्माण झालेल्या अडथळ्यामुळेच बहुजनवादाचे राजकारण नेहमीच पराभवाच्या वाटेवर उभे असते. 

स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्याही काळात प्रस्थापित पक्षात उच्चवर्णीय सवर्णांचे अधिक वर्चस्व होते. त्यामुळे ब्राम्हणेत्तर संख्येने अधिक असुनही त्यांना कायदेमंडळात स्थान मिळत नव्हते. महात्मा फुलेंनी स्थापन केलेली सत्यशोधक समाज हि राजकारणहित समाज संघटना असल्यामुळे तिचा राजकारणासाठी फायदा होत नव्हता. म्हणून वरिष्ठ वर्णाच्या राजकीय प्राबल्यास आव्हान देवून मराठे, कुणबी व वंचित समाजाचे हितरक्षण व त्यांना राजकीय सत्तेत वाटा मिळावा या दृष्टीकोनातून १९१७ साली ब्राम्हणेत्तर पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष तामिळनाडूच्या जस्टीस पक्षाची प्रतिकृती होती. या पक्षाचे राजश्री शाहू महाराज हे सर्वेसर्वा व बोलविते धनी होते. अस्मिता नसलेल्या लोकांना शिक्षणाद्वारे आत्मनिष्ठ बनविणे आणि राजकीय व सामाजिक अधिकारासाठी प्रस्थापिताविरोधात संघर्ष करणे असे या पक्षाचे दुहेरी उद्दिष्ट होते. परंतु या ब्राम्हणेत्तर पक्षातील अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी सारखे कित्येक सदस्य हे सत्यशोधक समाजाच्या विचाराचे नसल्यामुळे ते वंचित समाजाच्या प्रश्नासाबंधी इमानदार नव्हते. जेधे बंधू, भास्करराव जाधव, खंडेराव बागल व दिनकर जवळकर सारखे सत्यशोधकही त्यात सामील होते. त्यामुळे एकजिनसी बहुजन समाज त्याना निर्माण करता आला नाही. राजश्री शाहूना याची कल्पना होती. शाहू महाराजाच्या निधनानंतर या नेत्यांनी सत्यशोधकी भूमिका बदलत आपला पक्ष नेहरू-गांधीजीच्या कॉंग्रेसमध्ये (१९२२-२४) विलीन केला. अशा प्रकारे फुले-शाहुनी पाया घातलेल्या बहुजनवादी ब्राम्हणेत्तर चळवळीचा एक स्वतंत्र अध्याय बंद झाला.  

बहुजन चळवळीचा दुसरा अध्याय हा बाबासाहेब आंबेडकर व राम मनोहर लोहिया यांचे पासून सुरु होतो. दोघानाही बहुजन व वंचित घटकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी सामाजिक जागरुकता, हक्क व अधिकाराची मागणी आणि राजकीय सत्तेतील सहभागासाठी आंदोलने केली. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी आरक्षण, स्त्री अधिकार व राजकीय सत्तेत सहभागीता मिळवून देत बहुजन समाजाच्या सक्षमिकरणाच्या तरतुदी केल्या. कॉंग्रेस व तत्सम उच्चवर्णीय पक्ष हे बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास होवू देणार नाहीत या भूमिकेतून राजकीय पक्षाची निर्मिती करण्यात आली. परंतु बाबासाहेब आंबेडकर व लोहियांच्या मृत्युनंतर प्रादेशिक पातळीवर क्षेत्रीय नेत्यांचा उदय झाल्यामुळे ब्राम्हणेत्तर चळवळ अधिक विभाजित झाली.

कांशीराम यांच्या कार्यकाळात बहुजनवादाला अधिक धार आली. त्यांच्या बहुजनवादाने ओबीसी व वंचित समुदायांचे आकर्षण मिळवून त्यांना राजकीय सत्तेमध्ये भागीदार होण्यास प्रेरित केले. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सत्ता व काही राज्यात मिळालेले राजकीय यश हि बहुजनवादाची यशस्वी लहानशी चुणूक होती. लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग, नितीश कुमार व देवेगौडा यांची नेतेगिरी हि बहुजनवादातून उदयास आली. परंतु हा बहुजनवाद दीर्घकालीन व्यवस्थेचा भाग होण्यास अनेक अडथळे व मर्यादा आहेत. त्यामुळे बहुजनवादी राजकारण नेहमीच पराभवाच्या खडकावर उभे राहत आले आहे.  

बहुजनवाद ज्या कारणाने अपयशी ठरतो त्या कारणाचा येथे परामर्श घेणे आवश्यक आहे. त्यापैकी १.जातीय विखंडन आणि एकतेचा अभाव: बहुजनवाद हा विविध समुदायांचे प्रतिनिधित्व करीत असला तरी भारतीय समाजात खोलवर रुजलेली जातीय क्रमिकता, प्रभावी जातींना एकतेमुळे त्यांचे विशेषाधिकार गमावण्याची वाटणारी भीती आणि परस्परविरोधी हितसंबंधामुळे अविश्वास वाढून एकता निर्माण न होणे. २. संसाधनांचा अभाव: चळवळींमध्ये दीर्घकालीन राजकीय जमवाजमव टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक आणि संस्थात्मक संसाधनांचा अभाव असणे ३. मर्यादित संघटनात्मक संरचना: बहुजनवादी राजकीय पक्ष आणि चळवळींची संघटनात्मक ताकद आणि तिची पोहोच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तुलनेत कमकुवत असणे. ४. निवडणूक आव्हाने व मर्यादित यश: बहुजन समाज हि एक मोठी व्होटबँक असूनही, बहुजनवादी पक्षांना त्यांच्या संख्यात्मक ताकदीचे निवडणूक यशात रूपांतर करता येत नसल्यामुळे अप्रभावी मर्यादित यश  ५. विचारधारेचे अविकेंद्रीकरण: महिला, ओबीसी व तत्सम वंचित वर्गांना बहुजनवादी विचारधारा (बहुजन महापुरुषांचे विचार) व तिचे फायदे याचा प्रसार करण्यात आलेले अपयश ६. प्रभावी  नेतृत्व व संघटनेचा अभाव: राष्ट्रीय स्तरावर करिष्माई, इमानदार आणि संघटित क्षमता असलेल्या नेत्यांची अनुपस्थिती व विद्यमान सत्ता संरचनांना प्रभावीपणे आव्हान देऊ शकेल अशा केडर बेस संघटनेचा अभाव. नियमाधीष्ठित पक्षशिस्तीचा अभाव व संघटनामधील अपारदर्शितेमुळे लोकांचा गमावलेला विश्वास ७. संधिसाधू नेत्यावरील विश्वास: बहुजन जनता आपले तन-मन-धन देवून नेत्यांचे वेल्फेअर करते परंतु असे नेते जनतेचे वेल्फेअर विसरून संपत्ती व स्थान वाढविण्यास धडपडत असतानाही अशा संधिसाधू नेत्यांची पाठराखण करणे. ८. बहुजन वंचितांचे अनेक पक्ष: बहुजन वंचित वर्गात अनेक गटतट व पक्षाचे ऊत आलेले आहे. यामुळे सकारात्मक एकत्रित राजकीय कृतीची संभावना दृढमूल झाली असून बहुजन वंचिताचे काही पक्षनेते संविधानिक समताधिष्ठित व्यवस्थेला विरोध करणाऱ्या भाजप व संघाशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना प्रभावीपणे आव्हान देणारी एकसंघ राजकीय चळवळ उभी करणे कठीण झाले आहे. 

अशा स्थितीमध्ये यश हाती येत नसलेल्या बहुजनवादी राजकारणात न रमता बहुजन जनतेच्या विकेंद्रित लोकाभिमुख सामाजिक व आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्याच्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास देशाची वाटचाल अलोकतांत्रिक, विषमतावादी पुर्वगौरववाद, कंत्राटवाद व भांडवलशाहीकडे होत तिथून ती धर्माधित दडपशाहीकडे चालू आहे. राष्ट्राच्या विविधतेतील एकात्मतेची प्रतिमा दुभंगलेल्या आरशासारखी झाली आहे. राष्ट्राचा गाडा हाकण्यासाठी राज्यघटनेच्या तत्त्वांना धाब्यावर बसवून धर्माचा आणि विशिष्ट सामाजिक मतप्रणालीचा इतका उघड व निडरपणे आधार घेतला जात असल्यासारखी परिस्थिती आहे की, त्याच्या आधारासाठी अधिक आकडेवारी देण्याची गरज नाही. 

अलोकतांत्रिक विषम पुर्वगौरववाद व भांडवलवादी राजकारण हे बहुजन समाजासाठी नाशवंत ठरणारे आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे की, ही स्थिती बदलण्याचा मार्ग कोणता?. बहुजनवादी चळवळीची फुटीरता अशा वाढत्या धर्मांध राजकारणाला रोखण्यास असमर्थ ठरते. मात्र बहुजनांच्या वोटबँकेचे राजकारणच यात किमया करू शकते. त्यासाठी संधिसाधू राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या उणीवा उघड करून त्यागाची भावना असणाऱ्या बुद्धिवंतानी बहुजन-वंचित घटकांच्या विकासासाठी सर्वव्यापी व्यवस्थेत भागीदारीची हमी असे मुद्दे समोर ठेवून संविधान विरोधी शक्तींना पराभूत करण्यासाठी लोकशाही मुल्ये व बहुजन वंचित घटकांचे हितरक्षण करू पाहणाऱ्या पक्षासी समझौते करून निवडणुकांना समोर जाणे अपरिहार्यता समजली पाहिजे. 

लेखक: बापू राऊत



4 comments:

  1. साहेब असा कोणता पक्ष आहे? जो बहुजन वंचित घटकांचे हितरक्षण करू शकतो.

    ReplyDelete
    Replies
    1. बहुजन वंचित घटकांना प्रथम एकीकृत मजबूत अशी व्होटबँक बनवावी लागेल. त्या व्होट बँकेच्या आधारावर अटीच्या माध्यमातून हितरक्षण करणे गरजेचे आहे.प्रस्थापित पक्ष हे मतासाठी वंचितांच्या हिताच्या बाबीवर अंमल करू शकतात. त्यासाठी प्रथम मजबूत संघटनेच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादित करावा लागेल.

      Delete
  2. हे बदलत असलेल्या धर्मांध प्रवृत्तीचे द्योतक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. भारतात धर्मांध प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. भविष्यात भारताचा तालिबानी अफगाणिस्थान होण्याचीच अधिक शक्यता आहे.

      Delete