Wednesday, May 24, 2023

विवेक शिकला पाहिजे, धर्मांधता फेकली पाहिजे

ग्रीकमध्ये ई.स.पूर्व ४७० मध्ये साक्रेटीस नावाचा विचारवंत उदयास आला. विवेकी जीवन कस जगाव व सत्याचा शोध कसा घ्यावा यावर त्याने चिंतन सुरु केले. तरुण युवकासोबत संवाद साधत त्यांना ते मानवतावाद व विवेकवादाच्या तर्कपुर्ण गोष्टी सांगत. अथेन्समध्ये धर्मवादी लोकांसोबत चर्चा करून त्यांना वादविवादात हरवीत. तो धर्मवाद्यांना सांगायचा, तुम्ही तुमच्या भौतिक स्वार्थासाठी “देव कल्पना” निर्माण केल्या. तुमच्या देवाचे उत्सव व त्याला दिले जाणारे बळी ह्या अर्थहीन बाबी होत. देवता जर खरोखरच भल्या स्वभावाच्या असतील तर तो कशाला माणसाकडून आपली पूजा अर्चना करवून घेईल किंवा बळीची अपेक्षा करेल. देव जर हा सर्वाचा कर्ताधर्ता असेल तर तो सर्वाला समान न्याय देईल. कारण तुमच्याच मतानुसार त्याने सर्वांनाच निर्माण केले. मग तुमचे भले करण्यासाठी त्यानेच निर्माण केलेल्या प्राण्याचा तो बळी कसा घेईल?. साक्रेटीसच्या अशा शिकवणुकीचा त्यांचेवर प्रभाव पडे. अथेन्सचे तरुण मुले व नागरिक धर्मगुरुना प्रश्न विचारत. धर्मगुरू निरुत्तर होत. त्यामुळे

धर्माच्या ठेकेदारांना हा आपला अपमान आहे असे वाटे. म्हणून धर्मगुरु साक्रेटीसवर खोटे आरोप करू लागले कि ते तरुणांना संवादाद्वारे बिघडवतात. आरोप लावणारे अन्यायी व्यवस्था तशीच टिकून राहावी म्हणजे आपले हितसंबंध अबाधित राहून धर्माच्या माध्यमातून लोकाना लुबाडता येईल या वृत्तीचे होते. त्यांना धर्मशास्त्रात व प्रचलित व्यवस्थेमध्ये कसलाही बदल नको होता. म्हणून साक्रेटीसवर राजद्रोहाचा आरोप करीत धर्मशास्त्रविरोधी कृत्य केल्यामुळे त्यास मृत्युदंडाची शिक्षा व्हावी म्हणून खटला भरला. 

न्यायालयात ज्युरी समोर साक्रेटीस म्हणाला, ज्ञानी व ज्ञानाची पूजा करा. तर्कहीन बोलणार्या पाखंडी लोकांचे भय बाळगू नका’  या मतावर मी ठाम आहे. पुढे तो म्हणाला, धर्मांध लोकांचे ज्ञानाविषयीचे विचार उथळ व अपूर्ण असून त्यांच्या देवकल्पना ह्या स्वार्थमूलक आहेत. सुखी होण्याचे साधन म्हणजे ज्ञान. आपल्या बुद्धीचा वापर करून लोकांनी ज्ञानी व्हावे. सद्गुनामुळे  चांगल्या गोष्टी मिळतात परंतु खोटे बोलून फसविणे हा लबाड लोकांचा धंदा आहे.  या माझ्या शिकवणुकीवर मी कायम आहे. त्यामुळे कितीही वेळा मला मरावे लागले तरी मी सत्य सोडणार नाही. साक्रेटीसचे हे बाणेदार विचार ज्युरीना पटले नाही. कारण तेही धर्मशात्राचा वापर करणारे धर्मांधच होते. शेवटी साक्रेटीसना हॅमलाँक विषाचा पेला देवून ठार मारण्यात आले. येथे सत्याचा पराजय व खोटेपणाचा विजय झालाय. आजही जनता खोट्या कल्पना स्वीकारीत त्यातच मश्गुल आहेत. सत्याचा स्वीकार व स्वतंत्र तर्कबोध करण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. धर्म व कर्मकांडी व्यवस्थेला ते बळी पडत आहेत. त्यांच्यातील विवेक मरणासन्न झाला आहे. शिक्षेतून सुटका करवून घेण्यासाठी साक्रेटीसनी खोटे बोलावे म्हणून त्याचा शिष्य असलेल्या प्लुटोने विनाविण्या केल्या परंतु त्यास ते बधले नाही. पुढे याच प्लुटोने साक्रेटीसचे विचार जगासमोर आणले. 

दुसरे, रोमन साम्राज्यात जन्म घेतलेल्या गॅलिलिओने नवीनच शोध लावला. तो शोध होता पृथ्वी गोलाकार असून ती सूर्याभोवती फिरते”. परंतु  चर्चच्या धर्मशास्त्रानुसार पृथ्वी चपटी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरते. त्यामुळे गॅलिलिओचे म्हणणे धर्मविरोधी होते. चर्चच्या धर्मांध लोकांनी त्याला बोलावून म्हटले, तू धर्मविरोधी कृत्य केलास तुला शिक्षा व दंड झालाच पाहिजे.  गॅलिलिओ म्हणाला, मी माझ्या दुर्बिणीच्या माध्यमातून तार्यांचे निरीक्षण केले असून ते खरे आहे. त्यामुळे माझे म्हणणे मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी सत्यवचनी असून खोटे बोलणार नाही. धर्मांध लोक खवळले, ते म्हणाले, तू आमच्या धर्माच्या विरोधात कसे काय बोलू शकतोस? गॅलिलिओ शांतपणे म्हणाला, तुम्ही ज्या धर्माचे घटक आहात त्याच धर्माचा मी आहे. परंतु माझ्या शोधात जे अतार्किक व असत्य वाटले ते मी मांडले. वाटल्यास तुम्ही धर्मशास्त्रात दुरुस्ती करा.  परंतु धर्माची नशा चढलेल्या धर्मांधांनी त्याला दंडाची शिक्षा देत नजरकैद केले. त्याचेवर अनन्वित अत्याचार केले त्यातच गॅलिलिओला अंधत्व येवून ८ जानेवारी १६४२ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी चर्चच्या पाखंड धर्मांधांनी गॅलिलिओचे मत मान्य करीत पश्च्याताप व्यक्त केला.

तिसरे, भारतही यात तसूभर मागे नाही. सतराव्या शतकात तुकाराम महाराज नावाचे संत होवून गेले. त्यांनी प्रचलित अन्यायी धर्मव्यवस्थेवर आपल्या भजन व कीर्तनाद्वारे हल्ले चढविले. ते लोकाना पटू लागले. लोक त्यांचे भजन ऐकण्यासाठी आतुर होत. येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला त्यांनी आव्हान दिले होते. तुकाराम महाराजाच्या भजनामुळे लोक पुरोहित भटाकडे जाईनासे झाले. पाखंडी भटांचा धंदा चालेना. त्यामुळे मंबाजी नावाच्या भटाने तुकाराम महाराजानाच संपविण्याचे कारस्थान रचले. त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडविण्यात आले. कट रचून व खोटे बोलून महाराजांना भजन कीर्तनातून बाहेर नेण्यात आले. मंबाजी भट व त्यांच्या साथीदारांकडून त्यांचा खून करण्यात आला. खुनाचा आरोप आपल्यावर येवू नये म्हणून भलतेच कारस्थान रचले. तुकाराम महाराज पुष्पक विमानाने स्वर्गात गेले अशी थाप मारून आपल्या सुटकेचा निश्वास टाकला. लोकांनी मंबाजी भटाच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. तर्क व विवेकाचा विचारच केला नाही. धर्मांधता डोक्यात शिरली कि कोणाच्याही थापेला बळी पडण्याची सवयच होवून जाते. विवेक व तर्कबुद्धीला मेंदूत प्रवेशच दिला जात नाही.

खरे तर, विवेकबुद्धीच्या पिढ्या निर्माण करावयाच्या असतील तर, वास्तवतेकडे बघणे शिकले पाहिजे. सध्या एक किस्सा अधिक प्रचारात दिसतो. खरे हिंदू कोण? हा तो मुद्दा होय. जे हिंदू, हिंदू धर्मशास्त्रातील वाईट कल्पना व काल्पनिक देवांच्या अस्तित्वावर टीका करून त्यातील दोष दाखवितात. त्यांना दुसरे हिंदू प्रश्न करतात कि, तुम्ही हिंदू धर्मावर टीका करणारे कोण?. त्यामुळे कोणता हिंदू खरा? असा प्रश्न निर्माण होतो. हिंदू धर्मावर कोणा एकाची मालकी असेल तर बाकीचे हिंदू काय नोकर आहेत? असा दुसरा उपप्रश्न निर्माण होतो.

काही दिवसा अगोदर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात एक विवाद झाला. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते  राज ठाकरे प्रतिक्रिया देतात कि, हा विवाद “त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक नागरिकांनी सोडवावा. दुसर्यांनी त्यात लुडबुड करू नये”. यावर मंदिरातील काही ब्राम्हण पुरोहिताकडून प्रतिक्रिया येते की, हा राज ठाकरे हिंदु व हिंदू धर्माबाबत बोलणारा कोण?  या उलट राज ठाकरेंनी पुरोहितांना तुम्ही हिंदू धर्माचे कोण? असा प्रतिप्रश्न केला नाही. याचा अर्थ काय? राज ठाकरेचे हिंदू धर्मातील स्थान “चाकर” या श्रेणीतील ठरते, तर ब्राम्हण पुरोहित हे मालक ठरतात. मालकाविरोधात चाकर कसे बोलणार ! तसेही, हिंदू नेता म्हणून त्यांनी पूजेसाठी पुरोहितांना बोलावू नका असा उपदेश केला तरी बहुसंख्य हिंदू त्यांचे म्हणणे धुडकावून लावतील. असे हे हिंदू श्रेष्ठतेचे गणित आहे. त्यामुळे हिंदू धर्मात बहुसंख्य हिंदू बदल घडवू शकतील अशी सुतराम शक्यता नाही. जर कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्यांचा दाभोळकर व कलबुर्गी करण्यास काही माजलेल्या संस्था तयार आहेतच.  

बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्याचप्रकारे धर्मसुधारणा हा नव्या युगाचा गुणधर्म वाहव्यास हवा. ज्या टाकावू गोष्टी आहेत त्या फेकून दिल्या पाहिजेत. सर्वच  हिंदू धर्माचे पाईक परंतु त्यातही “मालक व चाकर” या धारणेवर प्रश्न उपस्थित केले पाहिजे. 

लेखक: बापू राऊत 

No comments:

Post a Comment