Sunday, August 25, 2024

पेशवाईचे पतन: हिंदुच्या मुक्तीसाठी खुले झालेले द्वार!


ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा शेवटचा टप्पा होता.