Saturday, December 29, 2018

आतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही

देशात दलितांच्या व वंचित समाज घटकांच्या न्यायाच्या संदर्भात प्रथम कोणाला दोषी ठरवायचे व कोणाला मोकळे सोडायचे हे प्रशासकीय शासन  व्यवस्थेकडून सत्ताधार्‍यांच्या संगनमतातून अगोदरच ठरविल्या जाते. त्यानंतर चौकसीच्या आराखड्याचा केवळ फार्स आखला जातो. अचानक एक दिवस असा येतो की, दबंग व सवर्ण  शोषणकर्त्याला मोकळे सोडून ज्यांच्यावर अमानुष अत्याचार झाला त्या शोषितालाच अपराधी ठरवून  शिक्षा देण्याचे कारस्थान चौकसी (पोलिस /सीबीआय/सिआयडी) संस्थाकडून घोषित केल्या जाते. लोकशाही व न्यायाचा गळा घोटला जात आहे. साक्षीदाराला खरीदण्या व धमकाविण्यासोबतच न्यायव्यवस्था सुध्दा नामदार झाली आहे. चार अक्षराची लोकशाही बेबस व निराधार झाली आहे. अशा अन्यायाच्या व विषमतावादी व्यवस्थेत गुदमरल्या सारखे होतय. न्याय कोणाला मागावा? कोणाकडूनच न्याय मिळण्याची शाश्वती नाही. अन्याय व शोषणाविरोधात आवाज उठवावा तर गद्दार व देशद्रोही ठरविल्या जात आहे. भीतभीतच व आतल्या आवाजाला आतच दाबून ठेवत जगायचे अंगवळणी पडत चाललेय. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांना वाचून व त्यांचे  विचार पचवूनही चवताळलेला मनातला आवाज बेंबीच्या देठा बाहेरही पडण्यास घाबरतो.  एवढ्या भीतीच्या दुनियेत जगावे तरी कशासाठी? स्वाभिमान, आत्मसन्मानाची कुचंबना व मानवतेची हत्या उघडया डोळ्यांनी पाहात बसण्यासाठी जगने हे शारीरिक जखमेपेक्षाही वेदना देणारे  क्षण आहेत. सामूहिक हत्या, तडफडत मरताना याचना करणारे प्रसंगमाजलेल्या मग्रुरांची हैवानत, जाती व धर्माच्या नावावर होणारे शोषण, स्त्रियावर बलात्कार करून होत असलेल्या हत्या, दलितांच्या व आदिवासीच्या जमिनीवर जबरदस्ती अतिक्रमण करून त्यांना हुसकावून लावण्याचे प्रसंग, पाठीवर पडणारे पोलिसांचे दंडे, त्यांच्या झोपड्यावर बुलडोझर फिरवून बेचिराख झालेली त्यांची स्वप्ने धनदांडग्याकडून लावलेली आग बघून ओक्साबोक्सी झालेली त्यांची मने बघत राहावी हे आता डोळ्यांनाही पटेनासे झाले आहे. पण त्यासाठी आता कोणावर चिढायचे रागवायचे?. मनात आलेला राग व्यक्त केलाच तर गद्दार व देशद्रोही म्हणत राष्ट्रीय म्हणविणार्‍या गॅंगच्या गुलामाकडून हल्ला झालाच तर बचावासाठी कोण येईल? हा प्रश्न आ वासून उभा राहतोच. अमीर खान, नसरुद्दीन शाह व कांचा इलय्या यांना हे चांगलेच कळून चुकले आहे. अशाच मुद्द्यावर प्रश्न करणार्‍या गोविंद पानसरे, कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर  आणि गौरी लंकेश यांना तर सरळ सरळ गोळ्या घालून निरुत्तर केले गेले. गोळ्या घालणार्‍या सनातनी संस्थाचे कोणी काय वाकडे केले? त्याउलट शोषणव्यवस्थे विरोधात, समान अधिकाराच्या मागणी संदर्भात व  स्त्री सन्मानासाठी आवाज उठविणार्‍याना शासकीय इतमानाने चिरडले जात आहे. 

राष्ट्रीय म्हणविणार्‍या एका संस्थेच्या गॅंगकडून फोन आला की पोलिस लगेच निरपराध्याना तुरुंगात डाबण्याची व्यवस्था करतात. आरोपासाठी हवे ती कलमे लावतात. खोटा बनाव करून गोदी मीडियात राष्ट्रीय चर्चा घडवून दोषी ठरविले जाते. चौकशी यंत्रनेकडून हाल हाल करून मारल्या जाते. या यंत्रणांनी चंद्रशेखर आझादला तर व्हील चेअरवर बसविण्याच्या परिस्थितीवर आणून सोडले होते. म्हणुनच आतला आवाज बाहेर पडायला तैयार होत नाही. त्या आवाजाला भीतीच्या व भयाच्या कांगोर्‍यांनी पूर्णता  घेरले आहे. पण तरीही स्वत:ला कधीही न भिणार्‍या, विषमतावादी व्यवस्थेला फेकून देत व जशास तसे टक्कर देनार्‍या  फुले-शाहू-आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेताहोत. खरे तर हा पराभवच आहे. या पराभूत मानसिकतेला कोणते घटक कारणीभूत आहेत, हे जेव्हा शोधायला लागतो, तेव्हा त्या कारणांचा शोध लागतो परंतु त्या मिळालेल्या उत्तरोत्तर शोधीत कारणाकडे लाचारासारखे हताशपणे बघण्याव्यतिरिक्त हातात काहीही उरलेले नसते. कारण त्या को-या उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहायला जागाच दृष्टीस पडत नाही.


लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment