Thursday, August 9, 2012

आंबेडकरी चळवळ व काही प्रश्न

आंबेडकरी चळवळी संदर्भात चर्चा करावयाची झाल्यास तिचे चार अंगभूत भाग पाडून चर्चा करावी लागते. आंबेडकरी चळवळीचे चार अंगभूत भागापैकी पहिला भाग हा सामाजिक, दूसरा राजकीय, तिसरा सांस्कृतिक/धार्मिक तर चौथा व शेवटचा भाग म्हणजे आर्थिक चळवळ होय. डॉ. बाबासाहेबांनी ह्या चारही चळवळीचे बिजारोपण करून त्यांना वाढविले. जगात कोणतीही व्यक्ती विशिष्ट कालावधी पर्यंतच जगत असते. अंतिम श्वासापर्यंत ती निर्माण केलेल्या चळवळीला टिकवून ठेऊन ती वाढविण्याचे प्रयत्न करीत असते. तरीही आपल्यानंतर चळवळीचे भवितव्य काय?. असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा ती व्यक्ती ज्या समुहाघटकाच्या न्याय हक्कासाठी लढत असते तेव्हा त्या समुहातून कार्यकर्ते व नेते तयार करीत असतो.(Click Read more for detail reading)

असामान्य महामानव आपल्या हयातीपर्यंत कार्यकर्त्यांना नेतेपदाचे धडे देत असतो. उद्देश एकच असतो की आपल्या नंतर आपल्या चळवळीचा व कार्याचा अंत होऊ नये. चळवळीचे फायदे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणे हे त्या मागचे महामानवाचे साध्य असते. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या चळवळीचे जी चार अंगभूते आहेत व त्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी बाबासाहेबांना जे साध्य करावयाचे होते ते आपले कर्तव्य त्यांनी बजावले आहे का?.
देशांतर्गत चळवळीच्या नेतृत्वासंदर्भात चर्चा न करता महाराष्ट्रापुरताच विचार करणे येथे अभिप्रेत आहे. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आज अनेक प्रश्न उपास्थित होताना दिसतात. आंबेडकरी चळवळ ही पेचात व भीषण संकटात सापडली आहे का?. ती नेता विहीन आहे का?. ती संधीसाधू वृत्तीच्या हातात गेली आहे का?. आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यास आज लायक जनमान्य/लोकमान्य  असे नेते  उपलब्ध नाहीत हा दावा खरा आहे का?. ह्या चळवळीत विश्वासू , निस्वार्थी व खंबीर अशा मार्गदर्शकाचा अभाव आहे का?. ह्या चळवळीला स्वार्थापोटी काहींनी जिवंत ठेवली आहे का?. आंबेडकरी चळवळीळा काही लोकांनी आपल्या पोटापाण्याचे साधन बनवून ठेवले आहे का?. आंबेडकरी चळवळ ही सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी वापरून  घेण्याचे खेळणे झाले आहे का?. सत्ताधारी व विरोधक हे आंबेडकरी चळवळीला आपल्या खिशातळी चळवळ समजतात हे खरे नाही काय?.   आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना लोक नावे ठेवतात व त्यावर हसतात हे नाकारायचे का?. असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत.

आज आंबेडकरी समाजातील अनेक लोक ज्याला काही जन दलितातील अभिजन वर्ग वा दलित ब्राम्हण अशी संद्या देतात ते आपल्या संमुहघटकापासून दूर जाताहेत, स्वत:च्या समुदायासी प्रतारणा करतात, दुस-याचे अनुकरण करतात. अशा गटातील लोक  आपली मुले –मुली लग्नाच्या घटकेला येईपर्यंत वा घरात एखाद्याचे मरण येईपर्यंत आपली जात लपवून ठेवीत असतात. हे सत्य तर आहेच परंतु अशी मंडळी नंतर नंतर ना घर का ना घाका या वस्थेतेत पोहोचत असते. दुस-या बाजूने विचार केल्यास हा अभिजन वर्ग राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात वावरणा-या लोकांचे विक्षिप्त वागणे, या संघटनातील दलदल, अनेक गतट, त्यांच्यातील स्वार्थीपना, नेत्यांची दलालीवृत्ती व नेतृत्वाचा खुजेपणा बघून आपल्या घरात बंदिस्त झाले असावेत हे खरे नाही काय?. हे जर खरे असेल तर या परिस्थितीला जबाबदार कोण?. अशी परिस्थिति निर्माण करना-या तथाकथित संघटना व त्यांचे नेते हे जबाबदार ठरत नाहीत काय?.

आंबेडकरी चळवळ ही दिशाहीन, मुद्देहीन व भरकटलेली आहे. या आरोपात तथ्य नाही काय?. आंबेडकरी राजकीय चळवळीतील प्रत्येक नेता  की जो स्वत:ही निवडून येऊ शकत नाही एवढेच नव्हे तर  आपल्या स्वबळावर एखादा नगरसेवकही निवडून आणू शकत नाही असे नेते स्वत:ला प्रती आंबेडकर समजतात हा आरोप खरा नाही काय?. आंबेडकरी चळवळीत विद्वान व बुद्धिमान तसेच सर्वगुण संपन्न  नेत्यांची कमतरता आहे असे नाही का वाटत?. आजच्या आंबेडकरी चळवळीत रामदास आठवले सारखा नेता हा समाजाचा व आंबेडकरी चळवळीचा नेता म्हणून मिरवितो हे चळवळीच्या -हासाचे कारण नाही का?. केवळ रामदास आठवलेच नाही तर  इतर नेतेही नेतेपदाच्या लायकीचे नाहीत या आरोपात तथ्य नाही का वाटत?. पावसाळ्यात शेणखतावर उगवणा-या असंख्य भूछत्र्यासारख्या आंबेडकरी संघटनाचा उगम होतो हे सत्य नाही काय?.मनुष्यपरत्वे संघटना निघताहेत हे जागरूकतेचे लक्षण नसून  आंबेडकरी चळवळीचा मतीतार्थच/उद्देश  नष्ट करण्याचे कारस्थान नव्हे काय?.

आंबेडकरवादी राजकीय चळवळीतील दादासाहेब गायकवाड पासून रा.सू.गवई यांच्या पर्यंतचे पर्व हे आंबेडकरी चळवळीतील काळे पानच होय.कारण या पर्वातील नेत्यांनी  चळवळीला ना दिशा दिली ना ध्येय दिले. त्यांनी राजकीय चळवळीची जी वाट लावली तिचे बस्तान अजूनही बसत नाही. इतिहासातून संदर्भ घेताना वर्तमानात्याचा कसा मुकाबला करायचं याचे धडे घ्यावे लागतात. असे धडे आजच्या कोणत्याही नेत्यांनी  घेतल्याचे दिसत नाही. आजची राजकीय चळवळ ही खुंटली आहे ती मुळातच खुज्या नेतृत्वामुळेच. आजच्या नेत्यामध्ये स्वत: बद्दलचा अहंभाव ठासून भरला आहे. किंबहून आजच्या नेत्यामध्ये नेतृत्वाचे कोणतेही गुणधर्म नाहीत. आठवले, प्रकाश आंबेडकर, कवाडे, गाडे, ढसाळ, कुंभारे या सामान्य व्यक्तिमत्व वाटणा-या गटातटाच्या नेत्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे सत्ताधारी व विरोधी पक्षातील आर्थिक संपन्नतेने पुर्णपणे भरलेल्या नेत्यांशी लागेबांधे असतात. स्वार्थामुळेच हे नेते समाजातील गरिबांचे प्रश्न हाताळू शकत नाही. मोठमोठे बिल्डर व राजकीय गुंडासोबत असलेल्या कार्यकारणभावामुळे झोपडपट्टीत राहाणा-या दलितांच्या झोपड्यावर बुलडोझर चढला तरी त्याचे यांना सोयरसुतक नसते. दलितांच्या शिक्षणाचा, विद्यार्थ्यांना येणा-या अडचणीचा (शिष्यवृत्ती/दाखले), अन्यायावर, दलित कामगार/शेतकर्‍यांच्या आत्महत्या यावर भाष्य करणेही दुरापास्तच झाले आहे हे वास्तव नाकारता येईल का?. केवळ निवडणुका जवळ आला की या तथाकथित नेत्यांना समाज आठवतो. कारण निवडणुकांच्या काळात हा समाजाचं त्याच्या आर्थिक देवाणघेवाणीचे केंद्र बनून जात असतो.

राजकारणात अयशस्वी झालेले नेते समाजकारण व धर्मकारणातही  लुडबूड करताना दिसतात. धर्मकारण व समाजकारण या क्षेत्राच्या आधारेच आपण राजकारणात टिकू शकतो व सर्वसाधारण लोकांचा पाठींबा मिळवू शकतो अशी तथाकथित राजकरण्याची धारणा बनलेली आहे.बुद्धिस्ट सोसायटी  ऑफ इंडिया व पीपल्स एज्युकेशन सोसायटी यावर रामदास आठवले यांचा ताबा आहे. तर भारतीय बौध्द महासभा ही प्रकाश आंबेडकर यांची काठी बनलेली आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या माध्यमातून  रा. सू. गवई व आता त्यांचे पुत्र राजेंद्र गवई हे राजकारण करताहेत. माणसे जमा होण्याची व गर्दी खेचण्याची ही शक्तीस्थळे आहेत. त्यावर आपला ताबा ठेवण्यासाठी जंगजंग पछाडतात हे नाकारता येईल का?.

राजकारण राजकीय सत्ता हे समस्या सोडविण्याचे माध्यम आहे. हे जे मान्य करीत नाहीत ते मुर्खाच्या नंदनवणात वावरत असतात. बाबासाहेबांनी नाही का सत्तेत दाखल होऊन बहुजन समाजाला हक्क प्राप्त होतील अशी घटना बनविली. याचा अर्थ सामाजिक चळवळी राबविणे सोडून द्यावे असे नव्हे. सामाजिक चळवळी ह्या व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहेत. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मंनपरिवर्तन करता येते व त्याद्वारे समान हक्क, समान वागणूक व मानसन्मान मिळू शकतो. आंबेडकरवादी सामाजिक चळवळीचे साध्य हेच आहे. विषमतावादी व्यवस्थेत सामाजिक हक्क, मांनसन्मान व आर्थिक बराबरी सहजासहजी मिळत नसते. तर त्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. सामाजिक संघर्षाचे बळ एकीतून निर्माण होते. गटातटाच्या माध्यमातून काहीही साध्य होत नाही तसे कधी झालेही नाही. त्यातून मानवी श्रम, पैसा व बळ मात्र वाया जात असते. समाजकारणात वावरणा-या बामसेफ सारख्या संघटनाचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना हे कळायला हवे. आपला आदर्श व साध्य एक असेल तर वेगवेगळ्या वाटा तरी कशासाठी?. रिपब्लिकन पक्षाच्या गटातटावर टीका करणारे बामसेफ नेतेही  त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेऊन चालत आहेत. व्यक्तीगत हेवेदावे, मत्सर व अहंकार या द्वारे अनेक चळवळी नष्ट झाल्या परंतु त्यांचे उद्देश कधीच सफल झाले नाहीत हा इतिहास आहे. मोठ्या संघटनांचे चालक या अनव्यये मा. वामन मेश्राम, बोरकर व एम्बसचे विजय मानकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या, ज्ञानाच्या  व आत्मविश्वासाच्या बळावर जनतेला त्यांचे हक्क, मांनसन्मान व आर्थिक बळ प्राप्त करून देण्याची तुमची जबाबदारी नाही काय?. अयशस्वी नेत्यांना बाजूला सारत समाजाला महाराष्ट्रापुरता तरी समर्थ राजकीय पर्याय देऊ शकत नाही काय?.  

काल परवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या काही सनदी अधिका-यांनी आपआपल्या स्वतंत्र संघटना काढल्या आहेत. या अधिका-यांना आपले योगदान हे चांगल्या संघटनेत सामील होऊन देता आले असते. या अधिका-यांना दुस-यांचे नेतेपद मान्य नसेल म्हणून नव्या नव्या संघटना काढाव्यात हे कितपत योग्य आहे?. काही आंबेडकरी साहित्यिक, नेते व निवृत्त अधिकारी धर्मक्षेत्रातही लुडबूड करताना दिसतात. ते आंबेडकरवादी बौध्द धर्म व परांपरागत बौध्द धर्म अशी बौद्ध धर्माची सरळ सरळ विभागणी करू लागले आहेत. हे धर्मप्रसाराच्या व धर्मवाढीच्या दृष्टीने मारक नाही काय?. प्रत्येकजण आपआपल्या परीने धम्मातील वचनांचा अर्थ लावताना दिसतात. त्यामुळे सामान्य जणांचा वैचारिक गोंधळ होतो हे यांना कोणी सांगावे?. स्वत:च्या स्वतंत्र   नवीन धर्मसंघटना काढणे हेच मुळात योग्य नसून अखील भारतीय अशी एकच बौध्द संघटना असावी व तिच्या भारतभर शाखा असाव्यात व त्या त्या विभागाच्या शाखेत काम करणे हे  साधारणपणे अपेक्षित असते. धर्माचा प्रसार/प्रचाराचे काम करना-यांच्या तत्वज्ञान प्राप्तीसाठी धम्मपीठ एक आवश्यक बाब झाली आहे. त्यामुळे धम्म संकल्पनाचा वैचारिक गोंधळ होणे तरी थांबेल.

                                                बापू राऊत
                                              9224343464 

No comments:

Post a Comment