Friday, June 21, 2024

आगामी विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निकालाचे परिणाम काय होतील !

 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकाचे निकाल हे राजकीय पंडित व प्रसार माध्यमानी उत्तरोत्तर एक्झिट पोल मध्ये दाखविलेल्या अंदाजाला खरे उतरले नाही. निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सुध्दा  महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांना सारख्याच जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. परंतु तसेही न होता भाजपाला केवळ ९ जागा दिलेल्या निकालाने सरकार समर्थित सर्वेक्षणाचे पोल उघडकीस आले. खरे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या पक्ष फोडीमुळे सत्ताधारी पक्षाविरोधात सुप्त रोष होता. पक्ष फोडणाऱ्या व पक्षातून फुटून निघणाऱ्या आमदारांनी मतदाराशी केलेल्या विश्वासघाताची शिक्षा मतपेटीतून व्यक्त झाली. त्यामुळे निवडणूक आयोग व केंद्र सरकारने पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करून पक्षांतर करणार्यांना परत लोकांचा कौल घेण्यास भाग पाडले पाहिजे. फोडाफोडीच्या प्रकरणाचा मोठा फटका भाजप प्रणीत महायुतीला बसणार, याची जाणीव भाजपाला झाली होती. म्हणून हा फटका कमी करण्यासाठी राज ठाकरे यांना महायुतीकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षांना मिळालेल्या निवडणूक चिन्हासारखेच दुसरे चिन्ह निवडणूक पत्रिकेवर आणून मतदारामध्ये संभ्रम होईल अशी चाल आखली गेली. नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत शेवटपर्यंत जागा संदर्भात चर्चा करतील व विशिष्ठ क्षणी ते एकला चलो चा निर्णय जाहीर करतील याची जाणीव सुध्दा भाजप नेत्यांना असावी. या तजविजीमुळे  महाराष्ट्रात फारसे नुकसान होणार नाही असा विश्वास ४०० पार च्या  नाऱ्यात झळकत होता.

Tuesday, June 11, 2024

बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल!


देशात नुकतीच २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये एक प्रकर्षाने जाणवले कि फुलेआंबेडकरी विचारधारेचे पक्ष म्हणविणारे सारे पक्ष हे धाराशायी झाले आहेत. बहुजनवादी राजकीय पक्ष म्हटला तर त्यात मुख्यत: बहुजन समाज पक्षाचा समावेश होतो तर प्रादेशिक स्तरावर वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांचे नाव घेता येईल. परंतु  राष्ट्रीय जनता दल व समाजवादी पक्ष  या पक्षांना फुले शाहू आंबेडकर विचारधारेतील पक्ष म्हणता येत नाही. रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष होता. या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून बहुजनांना राजकीय सत्ताधारी बनविण्याची त्यांची योजना होती परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्च्यात या पक्षाची अनेक शकले झाली. आजच्या स्थितीमध्ये तो विविध गटात विभाजित होवून अस्तित्वहीन झालाय. निवडणूक न लढता मंत्री होणारे रामदास आठवले हे केवळ निवडणूक प्यादे असून ते नगरसेवक म्हणून तरी निवडून येतील का? हा एक प्रश्नच आहे. कांशीराम यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून प्रेरणा घेवून बामसेफ हि सामाजिक संघटना व बहुजन समाज पक्ष स्थापन केला. त्यांनी देशातील बहुजन जनतेला जागृत करीत निवडणुकांच्या माध्यमातून अनेक राज्यात बसपाचे आमदार व खासदार निवडून आणले. तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बहुजन पक्षाची सत्ता स्थापण्यात यश मिळविले. बाबासाहेबांचे विचार व त्यावर कांशीराम यांचेकडून करण्यात आलेली अंमलबजावणी हा आता इतिहासाचा भाग झालाय.