चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या “छावा” कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या व भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात व त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस स्वार्थी व राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
संभाजी महाराजावर अनेकांनी पुस्तके व बखरी लिहिल्या आहेत. बर्याच बखरी स्वार्थी व पक्षपाती हेतूनी लिहिलेल्या आहेत. काही समकालीन परदेशस्त ब्रिटीश, फ्रेंच व पोर्तुगीज लोकांनी सुध्दा त्या काळातील स्थिती आपल्या रोजनिशीत नमूद केल्या आहेत. कोणत्याही ऐतिहासिक पुस्तकासाठी प्रत्यक्ष पुराव्याची कागदपत्रे, समकालीन लेखन व शिलालेखाची गरज असते. ऐतिहासिक पुस्तकासाठी असे काही साधने वापरली जात नसतील तर तो सत्य इतिहास कसा? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. राजे शिवाजी व संभाजी या द्वियीनी स्वराज्य स्थापनेसाठी मोठा संघर्ष केला. सर्व समाजाच्या सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून एक स्वतंत्र राज्य निर्माण केले. अशा परिस्थितीमध्ये राज्यात एक दुसराच अंतर्गत संघर्ष चालू होता. हा संघर्ष होता वर्णश्रेष्ठत्वाचा व जाती श्रेष्ठतेचा. या श्रेष्ठतेसाठी कोण्याकाळी, कोणीतरी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेतला जातो. अन्याय, विषमता व श्रेष्टतेचे गुणगान करणारे ग्रंथ हे कधीच सर्वसामाजाचे ग्रंथ होत नसतात. परंतु असे ग्रंथ भित्र्या समाजावर व कमकुवत बुध्दींच्या लोकावर लादता येतात. याची साक्ष भारतीय इतिहास देतो.
शिवाजी व संभाजी राजेचा धर्म कोणता होता? ब्राम्हणी कि अब्राम्हणी ! ज्या लोकांकडून शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकास विरोध करण्यात आला व ज्या पद्धतीने राज्याभिषेक पार पाडण्यात आला त्यावरून शिवाजी महाराजांचे विरोधक कोण होते व त्यांचा धर्म कोणता होता, हे लक्षात येते. शिवाजी महाराजांचा मृत्यू सुध्दा संशयास्पद असल्याचे इतिहासकार सांगतात. शिवरायांच्या आजारपणात मृत्युपूर्वी संभाजीना त्यांनी नक्कीच बोलाविले असते. परंतु शिवरायांच्या मृत्युनंतर कारकून असलेल्या ब्राम्हण मंडळीनी संभाजीला न बोलविता राजारामाचे मंचकारोहण केले व संभाजीस पकडण्यासाठी पन्हाळगडावर सैन्य पाठविण्यात आले. सोयराबाई या कटात सामील होत्या हे परमानंदच्या पुराव्यावरून समजते. मे-सप्टेंबर १६८९ च्या डच अहवालात शिवाजीला त्यांच्या दुसऱ्या बायकोकडून विषप्रयोग झाला असे म्हटले आहे. यावरूनच अष्टप्रधानातील कारकून हे स्वराज्यद्रोही होते याची कल्पना येते. या स्वराज्य द्रोहाचा कळस कारकुनानी संभाजीला पकडून देण्यात झाला. फ्रेंच वखारीचा गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन याने मार्च १६८९ मध्ये केलेल्या रोजनिशी नोंदीत ब्राम्हण कारभार्यांनी संभाजीला पकडून दिले असे म्हटले आहे.
संभाजीने राज्यकारभार स्वीकारल्यानंतर संभाजीला या ना त्या पद्धतीने संपवायचे यासाठी औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्याशी संधान साधण्यात आले होते. हे समजताच संभाजीने ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीकरवी
ठार करण्यात आले. कारकूनमंत्री व संभाजी यांच्यातील कलहाचे खरे कारण संभाजीचे प्रजावात्सल्य हे असल्याचे मंत्री शिवाजीजवळ तक्रार करीत असल्याचे परमानंद सांगतो.शिवाजी व संभाजी राजे यांच्यात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंत्री जीवावर उठलेले व बापाचा विश्वास उडालेला, अशा स्थितीमध्ये मोगलाकडे पळून जाण्याशिवाय संभाजीकडे पर्याय नव्हता. संभाजी २२.११.१६७९ ला पन्हाळगडावर परत आले. शिवाजी महाराजाने लगेच त्यांची भेट घेवून दिलजमाई केली. संभाजीस औरंगजेबाने ज्याप्रकारे शिक्षा दिली त्या पद्धतीने ती इतर कोणासही देण्यात आली नव्हती. परंतु तशी शिक्षा केवळ संभाजीस का देण्यात आली? औरंगजेबाकडून तशी शिक्षा देण्यास कोणाकडून भाग पाडण्यात आले ? मनुस्मृतीनुसार शिक्षा का देण्यात आली? एवढेच नव्हे तर शिवनेरी किल्ल्याच्या सभोवताल ज्या बुध्दलेण्या आहेत, त्याचा शिवरायासोबत कोणता सबंध होता? यावर अधिक संशोधन व्हावयास हवे.
संभाजीने ज्या प्रकारे मुलकी कारभार पूर्णपणे येसुबाईला तिच्या राजमुद्रेसह सोपविला तसा कारभार शिवरायाना जिजाबाईकडे सोपविणे शक्य झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शिवराय राजनीतिज्ञ असले तरी, धर्मशास्त्रज्ञ नव्हते. हि उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी संभाजीस संस्कृत शिकण्यास सांगितले. संभाजीने वयाच्या १६-१७ व्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. काहीजण या ग्रंथातील मजकुरावरून प्रश्नचिन्ह निर्माण करतात. जेव्हा शिवाजीने संभाजीकडे २६.०१.१६७१ ला कारभार सोपविला, त्यावेळेस अॅबे कॅरे त्यांच्या १६७२ सालाच्या अहवालात लिहतो, शिवाजी राजानी सर्वात शुर अशा दहा हजार सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला आहे. हां युवराज लहान असला तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तिस साजेल असाच शुर वीर आहे. युध्द्कलेत तो तरबेज असून त्याचे सौंदर्य हा सैनिकाकडे आकर्षण वाढविनारा गुण आहे.सैनिकास संभाजीच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते. सेनापति व सैनिकांनी आपल्या दहा-अकरा वर्षाच्या लहानग्या “हप्तहजारी” सुभेदाराकडे विशेष प्रेमाने व कौतुकाने पाहिले असेल तर नवल कसले ……..
परदेशी वखारवाल्यानी संभाज़ीस सवाई शिवाजी म्हटलेले आहे. बखरकरानी मात्र त्यांची तामसी,आतताई व दुर्व्यसनी म्हणून जी बदनामी केली तिच्या विरोधात सुरतकर इंग्रजांनी १८.१०.१६८० ला लिहले, ...संभाजीच्या सध्याच्या वर्तनुकीवरून तो त्यांच्या बापाचा स्वभाव व प्रकृति याहून निराळा आहे. त्याचा कारभार अधिक सुसंस्कृत, दयाळू व नेमस्त असा आहे. अगदी ३१.०३.१६८६ च्या संभाजीच्या मृत्यूपूर्वी
तीन वर्ष अगोदरच्या पत्रात लंडनहून लिहिले आहे कि, “ नेहमीच संभाजी राजाशी दृढ मैत्री राखा. कारण तो शूर व युद्धकुशल राजा आहे.”
मे १९७३ मध्ये मुंबैकर इंग्रजांनी टॉमस निकोलस यास शिवाजीशी बोलणे करावयास रायगडावर पाठविले होते. शिवाजी नसल्यास संभाजीशी बोलावे असा आदेश देण्यात आला होता. परंतु रायगडावर कारकुनांकडून संभाजी राजे लहान आहेत असे सांगून भेट नाकारण्यात आली होती. परंतु, दुसर्याच दिवशी संभाजीने टॉमस यास भेटावयास बोलाविले.
अशा शूर संभाजी राजास कपटाने पकडून देण्यात आले. संभाजी राजाचा इतिहास हा गौरवान्वित करण्यासारखा असताना त्यांना नाटक व कादंबर्यातून दुय्यम ठरविण्यात आले. यास कोण कारणीभूत आहे? म्हणून संभाजी राजाचे खरे शत्रू कोण? याचा शोध घेणे व त्यास ओळखणे काळाची गरज आहे. अन्यथा बहुजन राजे व महापुरुषांच्या इतिहासाला गालबोट लावण्याचे षडयंत्र वर्षोनवर्षे चालतच राहील. अशा षडयंत्राना रोखणे गरजेचे आहे.
लेखक: बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment