Thursday, June 26, 2025

लद्दाख येथील बौध्द धर्म: उगम व प्रसार


लद्दाख हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर पूर्ण राज्य असताना, लद्दाख हा जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग होता. लद्दाख हे क्षेत्र धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताचे एक महत्त्वाचे अंग आहे. कारण लद्दाखच्या सीमा भारताचे अंतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि चीनशी जोडल्या गेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ मध्ये पाकिस्तानने आणि १९६२ मध्ये चीनने लद्दाखवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु लद्दाखच्या जनतेने भारतीय सैन्याला भक्कम पाठिंबा दिला आणि १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बाल्टिस्तान प्रदेशातील तुर्तुक आणि थांग पर्यंतचा प्रदेश परत घेतला. लद्दाखी लोकांची भारताबद्दल असलेली ओढ आणि श्रद्धा अद्वितीय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारत गौतम बुद्धांची भूमी आहे आणि लद्दाखच्या लोकांचा बौद्ध धर्म व बुध्दावर दृढ विश्वास आहे. ब्रिटीश काळात लद्दाखमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी ब्रिटन, जर्मनी, इटली आणि हंगेरी येथून ख्रिश्चन धर्मप्रसारक आले. त्यांनी प्रथम येथे लद्दाखी आणि तिबेटी भाषा शिकून बौद्ध धर्म समजून घेतला.  त्यांनी लद्दाखी-इंग्रजी आणि लद्दाखी-जर्मन शब्दकोश तयार केले.

लद्दाखची धार्मिकता आणि परंपरावाद तिबेटी बौद्ध लामाशी अधिक जोडलेला आहे. पूर्वीच्या काळी तिबेट हे महायान आणि तिच्या संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. म्हणूनच लद्दाखमधील लोक अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या संदर्भात तिबेटी लामाकडे अधिक पाहतात. दलाई लामा हे त्यांचे आध्यात्मिक गुरू आहेत. चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतर, लद्दाख हा महायानी तत्वज्ञानाचा उत्तराधिकारी बनला. धर्माला सीमा नसल्या तरी, हे मर्यादित क्षेत्रासाठी म्हणता येईल. लद्दाखच्या इतिहासकारांचा असा विश्वास आहे की लद्दाखमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत म्हणजेच इ.स.पूर्व ३०० ​​च्या आसपास  झाला. त्या काळात स्थापन झालेल्या स्तूपाचे अवशेष, ज्याला स्थानिक भाषेत छोरतेन म्हणतात, आजही उपलब्ध आहेत. लद्दाखच्या जंस्करमध्ये स्थापन झालेला स्तूप सम्राट अशोकाने बांधला होता, त्याच ठिकाणी नंतर राजा कनिष्कने एक भव्य स्तूप बांधला. सध्या या स्तूपाला कनिष्क स्तूप म्हणतात. बौद्ध धर्मात मंदिरे आणि स्तूपांना प्रार्थनास्थळे म्हणून स्थापित करण्याची परंपरा खूप जुनी आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, त्यांच्या शरीराचे दहन करण्यात आले आणि त्यांची राख भिक्षूक आणि धर्मवाहकांनी जंबुद्वीपच्या चारही दिशांना (भारताला पूर्वी जंबुद्वीप म्हणून ओळखले जात होते) नेली आणि त्यावर मंदिरे/स्तूप बांधण्यात आले. असे करण्यामागील कारण म्हणजे जनतेला तथागत बुद्धांच्या साक्षर स्वरूपाचे  निरंतर स्मरण होत राहावे व त्यांच्या तत्वानुसार वागण्याची उर्जा मिळत राहावी हा होता.

(पुढील लेख सुध्लदा वाचा : लद्दाख: लेह ते नुब्रा व्हॅली मार्गे पँगोंग सरोवर (एक अविस्मरणीय प्रवास)

बौद्ध धर्माचे दोन मुख्य प्रकार आहेत. हीनयान आणि महायान. भारताव्यतिरिक्त, हीनयान परंपरेचे अनुयायी बर्मा, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि श्रीलंका इत्यादी आग्नेय आशियातील देशांमध्ये आहेत. तर महायान संपूर्ण आशिया, तिबेट, चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पसरलेला आहे. हीनयान परंपरेत, गौतम बुद्धाचे स्मरण करण्यासाठी चैत्य/स्तूप स्थापित करण्याची प्रवृत्ती रूढ झाली. महायान परंपरेत, बुद्धांचे स्वरूप आणि प्रतिमा दर्शविण्याचे विविध मार्ग आहेत. महायान परंपरेतून वज्रयान आणि तंत्रयान उदयास येतात. महायानी बौध्द धर्माचे हे स्वरूप संपूर्ण लद्दाखमध्ये ठळकपणे दिसून येते. म्हणूनच लद्दाखकडे महायानी बौध्द धर्माचे एकमेव केंद्र म्हणून बघता येते. बुद्धाची शिकवण व त्यांच्या प्रवचनांच्या संकलनासाठी अनेक परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. अशा परिषदांना त्या काळी संगीती हा शब्दप्रयोग वापरण्यात येत होता. अशा संगीतीमध्ये एकत्रित केलेल्या प्रवचनांना त्रिपिटक म्हटले गेले. पुढे हेच त्रिपिटक बौध्द धर्माचा धर्मग्रंथ म्हणून उदयास आला. लद्दाखमधील  महायान अनुयायी त्रिपिटकाला कांग्युर म्हणून संबोधतात. येथील लामा वेळोवेळी त्याचे पठण आणि अभ्यास करत राहतात. (यह लेख भी पढे : लद्दाख में बौध्द धर्म )

बौद्ध धर्माची चौथी संगीती सम्राट कनिष्कच्या काळात काश्मीरमधील कुंडलवन येथे झाली. त्याचा काळ सुमारे इसवी सन १०० आहे. या संगीतीमध्ये नागार्जुन, असंग, वसुमित्र आणि अश्वघोष यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. या संगीतीचा महत्त्वाचा परिणाम म्हणजेच महायान परंपरेची सुरुवात होय. योगाचार आणि माध्यमिक (शून्यवाद) हे महायान तत्वज्ञानाचे मुख्य भाग आहेत. परंतु आजच्या तिबेट आणि लद्दाखसह हिमालयीन प्रदेशात (भूतान, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश) प्रचलित असलेला महायान शाखेचा पाया ई.स ७-८ व्या शतकामध्ये आचार्य पद्मसंभव यांनी घातला. महाकश्यप आणि पद्मसंभव यांच्या लद्दाख भेटीची माहिती जुन्या कविता आणि रचनांमध्ये आढळते. महायानमध्ये पद्मसंभव यांना बुद्धानंतरचा दर्जा प्राप्त आहे. पद्मसंभव यांनी लद्दाखमध्ये लामा मठांची स्थापना केली. पूर्वीच्या काळी लद्दाखी तरुण शिक्षण घेण्यासाठी बौध्द विद्यापीठ असलेल्या नालंदा, विक्रमशीला आणि काश्मीरमध्ये जात असत. लद्दाखमधील बौद्धांनी इतर कोणत्याही धर्म किंवा पंथाला विरोध केला नाही. इतर विचारसरणींचा आदर करणे हे लद्दाखी समुदायाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. ते मितभाषी असून तथागत गौतम बुद्ध आणि इतर गुरुंच्या विचारांनी प्रभावित आहेत. लद्दाखी लोक लामा लोचावा रिन्छेंन जंगपो (११ वे शतक) आणि लोचावा फकपा शेसरब  (१४ वे शतक) यांची नावे मोठ्या आदराने घेतात. त्यांनी भारतीय भाषिक ग्रंथांचे तिबेटी भाषेत भाषांतर केले.  (यह लेख पढे- लद्दाख: लेह से पॅगोंग लेक व्हाया नुब्रा वॅली (एक अविस्मरणीय सफर)

लद्दाखमध्ये बौद्ध धर्माच्या परंपरांचा प्रसार करण्यात लामा मठांनी मोठी भूमिका बजावली आहे. जातक कथा मठ आणि मंदिरांमध्ये (गोंपा) चित्रित केल्या आहेत. येथे जुन्या मठांची संख्या इतर कोणत्याही मठांपेक्षा जास्त आहे. या मठांमध्ये तथागत बुद्ध, अवलोकितेश्वर, पद्मसंभव, तारा आणि मैत्रेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. लेह व कारगिल क्षेत्रात अतिशय दृश्यमान आणि सुंदर मठ स्थापन झाले आहेत, ज्यात लेह, हेमिस, थिक्से, माहे, हानले, स्पिटुक, प्यांग, लिकिर, लामायुरु, झंस्कर, डिस्किट आणि शांती स्तूप यांचा समावेश आहे. या मठांमध्ये बौद्ध उत्सव आणि धार्मिक मेळावे नियमित आयोजित केले जातात. लद्दाखी जनतेमध्ये आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव असलेला नवयांनी विचार आचरणात नसला तरी येथील जनतेच्या मनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या व्यक्तीने आपली पकड मजबूत केली आहे. लद्दाखी प्रार्थनामध्ये मानवजातीसाठी आनंद, शांती आणि समृद्धीचे दोहे असतात. परंतु, आधुनिक जीवनशैलीच्या गुंतागुंती, इतर धर्मांची आक्रमकता आणि धर्मातील राजकीय हस्तक्षेपामुळे बौद्ध परंपरा आणि लद्दाखी संस्कृती टिकून राहतील का? हा एक मोठा प्रश्न आहे.

लेखक: बापू राऊत 

No comments:

Post a Comment