Saturday, April 6, 2013

लक्ष्मण माने व उत्साही विरोधकांचा अत्यानंद

  
लक्ष्मण माने हे भटक्या विमुक्ताचे नेते म्हणून नव्हे तर उपरा या त्यांच्या आत्मकथनाने अधिक  लोकप्रिय आहेत. फुले आंबेडकर विचारधारेचा कट्टर समर्थक व  फर्डा वक्ता अशी त्यांची ओळख आहे. लक्ष्मण मानेला आपण कधीही प्रत्यक्षात भेटलो नाही वा त्यांना समोरासमोर कधी बघितले नाही तरी लक्ष्मण मानेच एक नात मनाच्या कप्प्यात कोरलेले आहे. हे नात फुले-आंबेडकरी विचाराच आहे. पुरोगामी विचाराच्या व्यक्तीना उपराकार लक्ष्मण माने यांच्या बाबत आपुलकी निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. जरी ते राजकीय दृष्ट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसशी जवळीक
साधून असले तरी तरी ते जातीं अंताच्या लढाईतील त्यांचा आवाज व जातीयवादावरचा त्यांचा हल्लाबोल ते कोणाचाही मुलाहिजा न बाळगता करतात त्यामुळे फुले -आंबेडकराच्या चळवळीला मानणा-या सगळ्यांचे ते आदरणीय आहेत.
सत्ताधा-यांच्या कळपात असल्यामुळे लक्ष्मण मानेंनी ब-यापैकी आर्थिक साम्राज्य निर्माण केले. त्यातून विरोधक निर्माण होणे हा निसर्गाचा स्थाईभाव आहे. मधल्या काळात त्यांनी जन्मासोबत चिकटून आलेल्या हिंदू धर्माचे सालटे काढून फेकून देत बुध्द धम्माचा स्वीकार केला. त्यांचे धर्मान्तर हे त्यांच्या स्वकीयासोबतच हिंदूवाल्यांना आवडले नव्हते. त्यामुळे लक्ष्मण मानेला कधीतरी पाहून घेवून असे म्हनणारा एक गट कार्यरत असावा.
अन्याय, अत्याचार, जातीयवाद याचा विरोध व समान संधीसाठी लढणारी फुले-आंबेडकरी चळवळ ही कोण्या एका पुरुष मक्तेदारीची जमिनदारी नव्हे तर स्त्रियांच्या भाव-भावना व अत्याचाराच्या विरोधात बाग देणारी तुतारी आहे. स्त्रीचा सन्मान हा फुले-आंबेडकरी चळवळीचा कणा आहे. त्यामुळे लक्ष्मण मानेच्या विरोधात ज्या पाच महिलांनी लैगिक अत्याचारासंदर्भात तक्रार केली त्यांच्या भावनाना ठेच न लावता सत्यशोधन होईपर्यंत त्यांच्यावर शिंतोडे उडविणे योग्य नाही. महिलावर चिखलफेक करण्याच काम फुले-आंबेडकरी कदापी करणार नाही. अत्याचार सहन न करणे हे आंबेडकरी विचाराचा गाभा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
लक्ष्मण मानेच्या विरोधात राजकीय वचपा काढण्यासाठी वा हिंदू धर्मावर टीका करीत बुध्द धम्म स्वीकारला म्हणून ज्यांचा तिळपापड झाला त्यांच्या षडयंत्राचा त्या पाच स्त्रिया बळी पडल्या असतील तर ते त्याच्या स्त्रीत्वाचे दुर्भाग्य असेल असे म्हणावे लागेल. स्त्री होण्याचा दुरुपयोग जर दुस-याची बदनामी व आयुष्य संपविण्यासाठी होत असेल तर अशांची सहानुभूती तरी का वाटावी?. लक्ष्मण माने दोषी असतील तर त्यांनाही शिक्षा व्हावी व अत्याचारित महिलांना न्याय मिळावा.
परंतु अत्याचाराच्या बातम्यापाठोपाठ लक्ष्मण माने विरोधातील एक उत्साही गट सक्रीय झाल्याचे दिसते. लक्ष्मण मानेच वस्त्रहरण होत असल्यामुले काहीना आसुरी आनंद मिळत आहे. लोकसत्ताच्या संपादकीयात “साडेतीन टक्क्याचा पदमश्री उपरा” असे शीर्षक देऊन आपल्या जातीद्वेषाचे फुत्कारे आजही ज्यो की त्यो आहेत असा संदेश मात्र देण्यास ते विसरले नाही. त्यापाठोपाठ लोकमत मध्ये हरी नरके यांचा लेख बरेच काही सांगून जातो. काही पदरात पाडून घेण्यासाठी मार्ग बदलावे लागतात कारण मार्ग बदलल्याशिवाय झोळीत कोणी काहीच टाकत नसतो. विद्या बाळ व हरी नरकेंच्या नेतृत्वाखालील सत्यशोधन समितीने    पिडीत महिलांची भेट घेवून त्यांचे मनोगतही प्रसिध्द झाले आहे. तर चित्रलेखा या साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव हे उपरा नाना फडणीस असे शीर्षक देवून मानेना झोडपतात. हे सर्व पुरोगामी चळवळीचे पाठीराखे आहेत त्यामुळे त्यांच्या टीका ह्या बोच-या असतील परंतु त्या सावध होवून सावरण्यासाठी आहेत  हे लक्षात घेतले पाहिजे परंतु चळवळीचे जे खरे विरोधक आहेत व परीवर्तनवद्यांच्या वैचारिक फटका-यांनी ज्यांची शास्त्रे व श्रध्दास्थाने  डळमळीत होवू लागली ते मात्र हास्याचे व आनंदाचे फवारे उडवीत त्यांचा स्वर्गानंद घेत असतील.
ते काहीही असो, प्रश्न आंबेडकरी चळवळीचा आहे. आंबेडकरी चळवळ ही परिवर्तनवादी असून  सनातनवाद्यावर घोर टीका करणारी व ब्राम्हनवादाचे लचके तोडत नवनिर्माण करणारी चळवळ म्हणून तिची ख्याती आहे. ही ख्याती आपल्या पुर्वसुरीपासून प्राप्त झालेली आहे व ती टिकवून ठेवण्याची धुरा आजच्या फुले आंबेडकरवाद्यावर आहे. सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात काम करणारा फुले-आंबेडकरी कार्यकर्ता, विचारवंत व नेतृत्व करणा-या नेत्यावर त्याची जबाबदारी आहे. म्हणून  फुले आंबेडकरी
चळवळीचे जे अर्धव्यू आहेत त्यांनी आपल्याला नियमात व आचारसाहिंतेत बाधून घेणे आवश्यक झाले हे लक्ष्मण मानेच्या प्रकरणातून इतरांनी घ्यावयाचा तो एक बोध आहे. असे झाले नाही तर ही चळवळ आवर्तनात सापडण्याची शक्यता आहे. जैसे थे वादी आंबेडकरी चळवळीच्या सोज्वळ चारित्र्यावर संशयाचे धुके निर्माण करून नाहक बदनामी करीत चौफेर हल्ला करतील मग त्यातून सावरणे कठीण जाईल. लक्ष्मण मानेच्या या प्रकरणामुळे चळवळीला धारेवर धरले जाईल. देव धर्म व अघोरी संस्कृतीच्या नावाखाली सामाजिक विषमता जपना-या व तिचे निर्लज्ज समर्थन करणा-या शक्तींना चळवळीतील धुरीणांची जेवढी जास्त बदनामी होईल तेवढी बदनामी हवीच आहे. त्यांना विरोधकच नष्ट करावयाचे आहे कारण बदनाम माणूस भविष्यात परिवर्तनवादी चळवळीचा मुखवटा होवू शकत नाही हे त्यांना पक्के माहीत आहे. सचिन माळी व शीतल साठे या परिवर्तनवादी युवकावर नक्षलवादाचा शिक्का मारून पोलीसी माध्यमातून चळवळ नष्ट करण्याचे मनसुबे गुप्तपणे चालू आहेत. नामोहरण करून चळवळीचे लचके तोडता येतात त्यामुळे उद्या त्यांच्या यादीवर दुसरा कोणीतरी आंबेडकरवादी येईल व त्याच्याही  माथ्यावर नक्षलवादाचा शिक्का मारतील. याचा चळवळीने व त्यांच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
असे असले तरी फुले-आंबेडकरी चळवळ तावून सलाखून निघेल. अग्निदिव्यातून बाहेर पडतच आजचे स्वरूप तिला प्राप्त झाले. त्यामुळे फुले आंबेडकरवाद्यांची प्रतीगाम्याच्या विरोधातील परिवर्तनाची लढाई सुरूच राहील. कोण एकामुळे ती थांबणार नाही. परंतु कार्यकते व नेत्यांना एक प्रसंग सांगावासा वाटतो, सावित्रीबाई फुल्यांना मुलबाळ होत नव्हती तेव्हा ज्योतीरावानी दुसरे लग्न करावे यासाठी त्यांचे आईवडील, नातेवाईक एव्हाना सावित्रीबाई कडूनही आग्रह होत असे. तेव्हा म.ज्योतिबा फुल्यांनी स्पष्टच सांगितले, मी मुळीच दुसरे लग्न करणार नाही उलट सावित्रीनेच दुसरा सवता आणलेला मला चालेल. अशी भूमिका घेणा-याच्या विचाराचे आपण पाईक आहोत याची जान चळवळीतील लोकांनी मात्र ठेवली पाहिजे. 
बापू राऊत
९२२४३४३४६४








-


No comments:

Post a Comment