Thursday, August 22, 2013

दाभोळकर साहेब तुमचे हे बलिदान व्यर्थ न जावो !


 एखाद्या चळवळीचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. चळवळीच्या संस्थापकाच्या मृत्युनंतरच त्या चळवळीच्या नेत्याचे महत्व समाजाला व शासनकर्त्यांना समजत असते. महात्मा ज्योतिबा फुलें, राजश्री शाहू महाराज, गाडगे महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व वी.रा.शिंदे यासारख्या महापुरुषांच्या मृत्युनंतरच त्यांच्या उतुंग विचाराचे व कर्तुत्वाचे मोल समाजाला व शासनाला समजले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डाक्टर नरेंद्र
दाभोळकर यांच्या बाबतही इतिहासाची तीच पुनरावृत्ती झाली. ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या विचाराचे व कर्तुत्वाचे महत्व ना समाजाला समजले ना शासनाला. डाक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकवादाने सा-या महाराष्ट्राला कसे वेडे केले आहे हे त्यांच्या मृत्यूनंतरच जाणवले, तोपर्यंत ते महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववाद्यांचे, समाजाला अज्ञानी ठेवू इच्छिणा-या व दुस-यांच्या कष्टावर आपले पोट भरणा-या लोकांचे टीकेचे केवळ केंद्र झाल्यासारखे वाटत होते. ते केवळ एकांगी लढताहेत असा भास वाटत होता परंतु तो केवळ भासच होता खरी वस्तुस्थिती नव्हती. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध झाला. लोक उत्स्फूर्तपणे निषेधासाठी बाहेर निघाले. जे कधीही बाहेर निघून आपला संताप व्यक्त करीत नसत तेही बाहेर निघून निषेध करू लागले हा खरा तर दाभोलकरांच्या व्यक्तीमत्वाचा, विचाराचा, त्यांनी जपलेल्या शालीनतेचा व विवेकवादाचा विजय आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे एका वादळाचे नाव होते. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समान शब्द बनून गेले होते. म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडल्यास लगेच विचारले जायचे कुठे आहेत तुमचे ते दाभोळकर?. अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावतीच होती. सामान्य माणूस अंधश्रद्धेमुळे आपल्या नातेवाईकांचा नरबळी देतो, चेटकुनीच्या नावाखाली स्त्रियांची नग्न धिंड काढतो आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाच्या नावाखाली अशिक्षित व अज्ञानी लोकांची होणारी फसवणूक या सा-या बाबी दाभोलकरांच्या ह्रदयाला पिळवटून टाकत असाव्यात. त्यामुळेच मानवतेला उध्वस्थ करू पाहना-या  संपूर्ण अंधश्रध्दाच्या उच्चाटनाचा विडा त्यांनी उचलला होता व कोणताही बाबा चमत्कार सिद्ध करून दाखवीत असेल तर त्यासाठी त्यांनी लाखोचे बक्षीस जाहीर केले होते. अजूनपर्यंत कोणताही  बाबा व  साधू बक्षिसासाठी समोर आला नाही. यावरून दाभोळकर हे किती दांडगे आत्मविश्वासी होते याची जाणीव होते.

दाभोलकर हे तरूण वयापासून सामाजिक कार्याकडे ओढले गेले होते. लोकांच्या दैनंदिन जीवनात व समाजात आजुबाजू घडत असणा-या वाईट गोष्टी व त्यांचा डोळस बुद्धीने केलेला अभ्यास याच्या चिंतनातूनच त्यांच्यातील सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली असावी. समाजातील विवेकाचा वाढता ऱ्हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा व अंधश्रध्दा यांचा वाढता घोर यांनी त्यांना तरुण वयातच अस्वस्थ केले. म्हणूनच एम. बी. बी. एस. झाल्यावर चांगले आयुष्य जगण्याची संधी त्यांनी नाकारली. 1977 साली सरकारी नोकरांचा संप घडला. राजपत्रित अधिकारी असूनही दणाणून भाषण केल्याने दाभोलकरांची नोकरी गेली. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यांतच सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करून चौकाचौकात सभा घेतल्या होत्या. परिणामाची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांचे धमकीचे व मारण्याचे फोन येत असतानाही ते आपल्या कार्यापासून तसूभरही मागे हटले नाही.

दाभोळकर हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला भूषणावह होते. त्यांचा विवेक जागर व अमोघ वाणी अप्रतिम होती. आपले म्हणने पटवून देण्यात ते निष्णात होते हे त्यांच्या अनेक भाषणातून व चर्चेतून जाणवत होते.   केरळचे रॅशनॅलिस्ट असलेले बी प्रेमानंद यांच्या प्रेरणेतून दाभोलकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली होती.  नागपुरात श्याम मानव यांच्या सारख्या तरुणांनी एकत्र येऊन 'मानवीय नास्तिक मंच' उभारून 'अधश्रध्दा निर्मूलन' या विषयावर काम सुरू केले. पण थोड्याच काळात 'नास्तिक' या शब्दावर खल होऊन या मंचाने 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती' हे नाव धारण केले. पुढे, शाम मानव यांच्याशी समितीच्या कार्यात्मक स्वरूपाविषयी झालेल्या मतभेदांनंतर 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती' 'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती' असे समितीचे दोन भाग झाले. त्यातील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची धुरा नरेंद्र दाभोलकर समर्थपणे गेल्या अनेक वर्षांपासून संभाळत होते तर 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ चे काम श्याम मानव पहात आहेत.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून दाभोलकर अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करत असले तरी, समाजपरिवर्तनाच्या व्यापक 'चळवळीतला हा एक टप्पा आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी कधीच कोणत्याही प्रकरणात टोकाची भूमिका घेतलेली नव्हती. त्यांनी देव व धर्म यांच्यावर सरळ सरळ टीका करण्याचे टाळले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे कट्टर परीवर्तनवाद्यांची टीकां त्यांना अनेकदा सहन करावी लागली होती. परंतु सार्वजनिकरित्या देव व धर्म नाकारना-या डाक्टर श्रीराम लागू यांचे कौतुकही कट्टर  परिवर्तनवादी करताना दिसत नाही. दाभोळकरांनी एकूणच मानवतावादी चळवळीच्या संदर्भातील बेसिक (मुलभूत) दुषित बाबीवर अधिक भर दिला होता. लोकांच्या भावनांना न् दुखावता त्यातील दोष कसे दाखविले पाहिजे हे त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतूनही स्पष्ट होते. त्यांची 'भ्रम आणि निरास', 'अंधश्रध्दा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम', 'अंधश्रध्दा विनाशा'', 'विचार तर कराल', 'श्रध्दा-अंधश्रध्दा' आणि 'लढे अंधश्रध्देचे' ही ग्रंथसंपदा आहे. यामधून अंधश्रध्दांचे विविध प्रकार, त्यामागची चिकित्सा करण्याची पध्दत, समितीने त्याविरूध्द वेळोवेळी उभारलेले लढे आणि यामागची वैचारिक बैठक स्पष्ट होते. या पुस्तकांतून दाभोलकरांचे अंधश्रध्दा, विवेकवाद व तत्सबंधित विषयांवरचे प्रभुत्व, त्यांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्ययास येतो. त्यांनी चळवळींचे काम करत असताना आपल्या हातून झालेल्या चुका, आपल्यापुढे उभे ठाकलेले प्रश्न प्रांजळपणे मांडलेले दिसतात. सोपी मांडणी, अनेक उदाहरणे देत विषय समजावण्याची हातोटी, विचारांची ठाम व आग्रहपूर्वक मांडणी, मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या लेखनशैलीची काही वैशिष्ट म्हणता येतील. दाभोलकरांची कार्यावरील निष्ठा आणि विधायक, सनदशील मार्गावरून अंधश्रध्दा निर्मूलनाची लढाई करण्याची त्यांची विचारधारा यांचाही परिचय होतो.

अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रस्तुत विधेयक हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. अंधश्रध्दा ही प्रामुख्याने गरीबाला गरीब ठेवण्याचे कारस्थान आहे. ज्यांचे या अंधश्रध्दातून शोषण व  नुकसान होऊन जीवन उध्दवस्त होते त्यांना वाचविणे हा या विधेयकाचा मुख्य गाभा व उद्देश आहे. या कायद्यानव्ये दुर्बल घटकांना संरक्षणाची हमी प्रतिपादित होते. हा कायदा कोणत्याही धर्माचे नुकसान करीत नाही. तरीही हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी विरोधी भूमिका घेतली. सनातन संस्था, आर एस एस, विश्व हिंदू परिषद व हिंदू जनजागृती मंच या राष्ट्रद्रोही ब्राम्हणी संघटनांचा विधेयकाला विरोध आहे. या विधेयकाला जसा विरोधी पक्षाचा विरोध होता तसाच तो विरोध सत्ताधारी कांग्रेस व राष्ट्रवादी पक्षातूनही उमटत होता. १३ एप्रिल २००५ रोजी सत्तारुढ पक्षाच्या आमदारांनीच स्वत:च्या सरकारने केलेल्या कायद्याचे बिल रोखण्याचा अविवेक प्रयत्न केला होता. कांग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील आजी-माजी मुख्यमंत्री, मंत्री व आमदार हेच खरे अंधश्रध्दाळू आहेत. ते अनेक बाबांचे /साधूचे भक्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनेक बाबांचे पाया पाडण्यात धन्यता मानणा-या या सत्ताधा-यांना मनातून हा कायदाच नको आहे. याच कारणामुळे कायदा व्हायला इतकी वर्षे लागत आहेत.

मताचे राजकारण हेही याला कारणीभूत आहे. बहुसंख्य समाजाची संख्या याचा विचार राजकीय पक्ष करीत असतात. परंतु परिवर्तनवादी कायदा हा लोकभावनेकडे बघून पास केल्या जात नसतो. विवेकवादी व विज्ञानाची कास धरणारे सरकारच परिवर्तनवादी कायदे बनवू शकतात. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रातीलतील लोक हे खरेच पुरोगामी व परिवर्तनवादी आहे का?. अशी शंका निर्माण होते. हे राज्य पुरोगाम्यांचे आहे, हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचे आहे, हे राज्य विज्ञानवाद्यांचे आहे अशा प्रकारचा डांगोरा पिटण्यात येतो. परंतु हे सारे खोटे असून दिखाऊपणा व बडेजावूपणाचा कळस आहे. महाराष्ट्राचे खरे चित्र हे फार वेगळेच आहे.

महाराष्ट्र हे प्रतीगाम्याचे मुख्य केंद्र बनत आहे. धर्मवेडेपणा या राज्यात अधिकाधिक वाढत असून धर्मांध संस्थांचा वावर जोमावर चालू आहे. धर्मांध लोक खुलेआम परीवर्तनवाद्यावर हल्ले करू लागली आहेत. परिवर्तनवादी साहित्य व परिवर्तनवादी लेखक यांचे साफ्ट टार्गेट झालेले आहेत. महाराष्ट्रातील प्रशासन व पोलीस खातेही या धर्मांधांना पुरेपूर सहकार्य करताना दिसते. त्यामुळे केवळ कालचाच नव्हे तर आजचाही   महाराष्ट्र हा पुरोगामी नाही. केवळ महापुरुष व समाजसुधारकांचा जन्म एखाद्या राज्यात होणे म्हणजे ते राज्य पुरोगामी होते हा निष्कर्ष काढणे व तसा निकष लावणे हे चुकीचे आहे. पुरोगामी राज्य बनण्यासाठी वा म्हणवून घेण्यासाठी त्या महापुरुष व समाजसुधारकांचे विचार कायद्याद्वारे अंमलात आणावे लागतात. धर्मांधांना न जुमानता व न भिता परिवर्तनवादी कायदे बनवून त्याची अंमलबजावणी केली जाते. या निकषावर महाराष्ट्र खरेच टिकते काय?. खचितच नाही, त्यामुळे आजचा महाराष्ट्र हा पुरोगाम्यांचा नव्हे तर प्रतीगाम्यांचा व धर्मांध्यांचा आहे.

हे राज्य आता प्रतीगाम्यांचे झाल्यामुळे या देशात अंधश्रद्धा विरोधी बिल कायद्याच्या रूपात येत नाही. नरेंद्र दाभोळकर सारख्या विवेकवादी माणसाची हत्या होते, धार्मिक फसवणुकी संदर्भात बोलल्यास तोंडाला काळे फासले जाते.  तरीही पुरोगामीत्वाची झालर अंगावर घेतलेल्या माणसाचे तांडे प्रतीगाम्यांना टक्कर देतील व त्यांना पराभूत करून सळो कि पळो करून सोडतील व हीच डाक्टर नरेंद्र दाभोळकरांना खरी श्रन्दांजली ठरेल.  शेवटी एकच म्हणावेसे वाटते कि, ‘दाभोळकर साहेब तुमचे बलिदान व्यर्थ न् जावो’ !

                         लेखक: बापू राऊत
                                                ९२२४३४३४६४










No comments:

Post a Comment