Saturday, July 9, 2016

आंबेडकर भवन व इलाईट क्लास

सध्या मुंबई स्थित आंबेडकर भवन  च्या मुद्द्यावरून आंबेडकरी समाजातच दोन गट पडल्याचे जाणवते. एक आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध करणारा तर दुसरा समर्थन करणारा. भावी काळात आंबेडकरी समाज आपापसातच भिडण्याची ही नांदी आहे. पहिल्यांदाच आंबेडकरी समाजातील व्हाईट कलर वर्गाने आंबेडकरांच्या प्रतीकाच्या विरोधी भूमिका घेतलेली दिसते. एव्हाना एखाद्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडल्यावर जे आक्रंदन राजकीय नेते, टय सुटवाला वर्ग व सामान्य जनता करायची ती तीव्रता कमी झालेली आढळते. म्हणजे एकूणच आंबेडकर या महामानवाप्रतीची आस्था  कमी झाली असेही म्हणता येते. तसे बघितल्यास महाराष्ट्र ही महामानवांची कर्म व जन्मभूमी राहिली असली तरी ती वैचारिक क्रांती करून बदल घडविणारी भूमी असा तिचा मुळीच लौकिक नाही. स्वार्थी व दलाल (चमचेगिरी) प्रवृत्तीचा एक खास वर्ग येथे तयार झाला आहे.
ज्याची इलाईट क्लास म्हणून गणना होते. तो कधीच रस्त्यावर येवून मोर्चा काढून पोलिसांच्या लाठया अंगावर झेलत नसतो. तर पुस्तकी व वर्तमानपत्रीय वाचनाच्या माध्यमातून आपले मत मांडीत असतो. केवळ बुद्धिमत्ता व चतुरपणाच्या जोरावर स्वत:च्या आर्थिक विकासाची सूत्रे शोधत असतो. भावना, आस्था, वसा, स्मुर्त्या व वारसा हे विषय त्यांच्यासाठी बकवास असतात. प्रसिध्दी झोतात आल्यावर हा वर्ग सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांभोवती पिंगा मारीत फिरत असतो व स्वत:च्या पदरात जेवढे  पाडता येईल तेवढे तो पाडून घेतो.
त्यामुळे क्रांतीकारक किंवा जननेत्याचा वसा त्यांच्यात मुळातच तयार होत नसतो. जनमत पाठीसी नसतानाही व जमिनी कार्य न करता ते स्वप्नाचे इमले बांधीत असतात.  
हल्ली मजुरांचे, शेतमजुरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न, झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीबांच्या समस्या ह्या चळवळीच्या यादीतून नाहीशा झालेल्या आहेत. आपल्यातीलच वाईट प्रथा व सवयी नष्ट करण्यासाठी कोणीही सामोरे येत नाहीत. आजही ८० टक्के आंबेडकरी समाज हा अविकसित भागात वास्तव्य करतो. तोच चळवळीसाठी रस्त्यावर उतरतो परंतु त्यांच्या समस्यावर विचारही होत नाही. गरीबांच्या शिक्षणाच्या मुलभूत दुर्लक्षितपणावर कोणीही कटाक्ष टाकीत नाही. ही चळवळीची मोठी शोकांतिका आहे.

 बापू राऊत

९२२४३४३४६४ 

No comments:

Post a Comment