Saturday, May 7, 2022

शाहू राजेंच्या वेदोक्तास टिळकांचा विरोध (भाग १ )


देशात व विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी राजेनंतर राजघराण्यातील  सर्वात जास्त चर्चित व्यक्ती कोणी राहिली असेल तर ती कोल्हापूर संस्थानाचे  राजश्री शाहू  होत. शिवाजी राजे व शाहू राजे यांचे कार्य व विचार पध्दतीमध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राह्मणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राह्मणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर या दोन व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट जाणवतो. ब्राह्मणवर्ग राबवित असलेल्या धर्म व जात सहिंतेवर आघात करणे शिवाजी राजेंना जमले नाही. शाहू राजेंनी मात्र यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. शिवाजीनी मुघलाकडून झालेल्या अपमानाचा समाचार घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्व‍कीयाकडून झालेला अपमान त्यांनी धर्मसहिंतेच्या नावाखाली पचवून टाकला. 

कोणताही इतिहासपुरुष हा परिपूर्ण नसतो परंतु त्या इतिहास पुरुषाचे राहिलेले अपूर्ण कार्य पुढे नेण्यासाठी कोणीतरी पुढे प्रासंगिक परिस्थितीतून निर्माण होत असतो. शिवाजी राजेनंतर त्यांचे अनेक वारसदार सत्तेवर आले. त्यांच्या अनेक वारसदारांना ब्राह्मणी धर्माचे चटके व अपमान सहन करावे लागले. परंतु त्यापैकी कोणालाही एकजातीय वर्चस्ववादी प्रस्थापित धर्म व सांस्कृतिक व्यवस्थेला नष्ट आले नाही. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सन्मानजनक जीवन जगण्याच्या विचारधारेची गरज असावी लागते. कोल्हापूर संस्थानाची राजवस्त्रे धारण करण्यापूर्वी व नंतरही शाहू राजेंचे मन हे सन्मानाने जीवन जगण्याच्या विचाराने मोहित झाले असावे. पाश्चिमात्य विचारवंत, आर्यसमाजी विचार व म. ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा पगडा त्यांचेवर होता. त्यामुळेच त्यांचे मन धर्म व संस्कृतीच्या नावावर अधार्मिक कृत्ये व सामाजिक विषमता निर्माण करणार्‍या विरोधात बंड करण्यास प्रवृत्त झाले.

टिळकांच्या जीवनकार्यात आलेले महत्वाचे प्रकरण म्हणजे “वेदोक्त” प्रकरण (१८९९) होय. काय होता हा वेदोक्तवाद?  हा वेदोक्तवाद टिळकांशी कसा निगडीत होता? यावर विवेचन करणे अधिक महत्वाचे ठरेल. छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक तसेच सातार्‍यांचे प्रतापसिंह भोसले यांच्या कार्यकाळात राज्यभिषेक व वेदोक्त धर्मसंस्काराचा हक्क यावरून मोठे वादंग माजविल्या गेले होते. राजश्री शाहू आणि सयाजीराव गायकवाड यांनी मात्र कर्मठ ब्राह्मण पुरोहितांशी लढत दिली. परंपरानिष्ठ ब्राह्मण पूरोहितशाही  विरुध्द शाहू राजेनी निकराचा लढा दिला. यालाच वेदोक्त प्रकरण असे म्हणतात. या वादंगात टिळकांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात फार गाजले. ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेत्तर असा वाद निर्माण होऊन शाहू राजे हे मराठा अस्मितेचे मोठे प्रतीक बनले होते. शाहू राजेंच्या राजवाड्यातील पुजारी राजोपाध्ये हा त्यांच्या घरातील कोणतेही धार्मिकविधी वेदोक्त मंत्रोपचारानुसार करीत नसून पुराणोक्त मंत्रांनी करीत असे. राजेंनी या धार्मिक पूजापठणाकडे कधीही विशेष लक्ष दिले नव्हते. राजोपाध्येचे हे कारस्थान राजारामशास्त्री भागवत यांनी शाहू राजेंच्या लक्षात आणून दिल्यानंतर शाहू राजेंनी राजोपाध्येस राजवाड्यातील सर्व धार्मिक संस्कार हे वेदोक्त मंत्रानी करण्यास सांगितले यावर राजोपाध्येनी उलट उत्तर दिले. राजोपाध्ये म्हणाला, परंपरा व शास्त्रानुसार शूद्रांच्या घरची पूजा व धार्मिक संस्कार हे केवळ पुराणोक्त मंत्राद्वारेच केले जातात. तसेच शूद्रांच्या घरी पूजा करण्यासाठी ब्राह्मणांस स्नान करण्याची सुध्दा गरज नसते. आपला वर्ण शुद्र असल्यामुळे राजवाड्यातील पूजा व धार्मिक संस्कार हे वैदिक मंत्रोपचारांनी करता येणार नाहीत. वैदिक परंपरेनुसार तो दर्जा केवळ ब्राह्मण व क्षत्रियांचा आहे. हा खरे तर शाहू राजेंचा अपमान होता. या घटनेनंतरही शाहू राजेंनी राजोपाध्येस वेदोक्तमंत्राची आज्ञा केली. राजोपाध्येने शाहू राजेंच्या आदेशाचे पालन करण्यास स्पष्ट नकार दिला.

राजोपाध्येच्या नकारानंतर शाहू राजेंनी त्याचे राजपुरोहित पद व बक्षिसात दिलेली जमीन जप्त केली. दुसरीकडे नारायण शास्त्री व काही पुरोहित ब्राह्मणांनी शाहू राजेंचे समर्थन करीत वेदोक्तानुसार त्यांच्या घरी कर्मकांड केले. ह्या प्रसंगानंतर, टिळकांनी नारायण शास्त्री भट्ट यांना शाहूंचा ब्राह्मण गुलाम असे म्हटले. शुद्रांच्या घरचे विधि वेदोक्त मंत्रानी करण्यास विरोध दर्शवून शाहूंच्या वेदोक्त मंत्रानी कर्मकांड करावयाच्या मागणीला टिळकांनी उन्माद असे म्हटले. टिळक एवढ्यावरच थांबले नाहीत तर वेदोक्ताने शाहूच्या मनाचे संतुलन बिघडवले आहे असेही म्हटले. अधिकाराचा गैरवापर करून ब्राह्मणांच्या कार्यात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप टिळकांनी शाहू राजेवर केला. एवढेच नव्हे तर शाहू राजेनी वर्णाश्रम धर्माचा अभिमान वाटून राज्याच्या भरभराटीसाठी वंशपरंपरागत कर्तव्य केले पाहिजे असे म्हटले  होते. परंतु धर्मशास्त्राप्रमाणेच, ‘राजकीय सत्ता हातात घेणे हे सुध्दा ब्राह्मणांचे काम नव्हतेहे मात्र टिळक साफ विसरले होते.

टिळकांनी वेदोक्ताचा प्रश्न कोल्हापुरातील शंकराचार्यां ऐवजी ब्राह्मण समुदायाला मध्यस्थांनी ठेवून मिटविण्याची सूचना केली होती. ते म्हणाले, राजोपाध्ये धर्मग्रंथानुसार काम करीत आहेत, त्यांच्या बक्षिसाची जमीन जप्त करणे अन्यायकारक आहे. इतकेच नव्हे तर टिळकांनी त्यांना धमकी दिली होती की, यावरही शाहू मानत नसतील तर ब्रिटिश सरकारकडे तक्रार करून त्यांचे कोल्हापूर संस्थान बरखास्त करण्यासाठी विनंती करू अशा प्रकारचा दबाव त्यांनी शाहू राजेंवर आणला होता.

वेदोक्त प्रकरण जेव्हा करवीर पिठाचे शंकराचार्य म्हणून काशिनाथबुवा ब्रह्मनाळकर यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी शाहू राजेंचे क्षत्रियत्व नाकारले. याचा आनंद होवून महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांनी तो धूमधडाक्यात साजरा केला. कोल्हापूरच्या छत्रपतीचा शुद्रनृपती म्हणून धिक्कार करणार्‍या काशीनाथबुवा ब्रह्मनाळकर यांचा धर्मवीर म्हणून जयजयकार करण्यात आला. गावागावातून त्याच्या पालख्या व प्रवचने आयोजित करून त्याला देणग्या देण्यात आल्या. परिणामी शाहू राजेंनी काशिनाथबुवा ब्रह्मनाळकर यांची शंकराचार्य पदावरील नेमणूक रद्द करून त्याचे उत्पन्न व इनाम जप्त केले. काशिनाथबुवा ब्रह्मनाळकर यांचेवर टिळकांची खास मर्जी होती. धर्माच्या पोकळ अभिमानाने टिळकांना आपल्या वर्णाश्रम धर्माच्या उचनीचतेला कायमस्थानी ठेवायचे होते या शंकेला कोणताही वाव उरत नाही. 

लेखक:बापू राऊत 

(बाळ गंगाधर टिळक:एक चिकित्सा या प्रस्तावित पुस्तकातील भाग , लेखक -बापू राऊत)

3 comments:

  1. शाहु महाराजांनी कोल्हापुरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शिक्षण देण्यासाठी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इंन्स्टिट्युटची स्थापना केली. कामगारांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी राजाराम इंडस्ट्रीयल स्कुलची स्थापना केली. शाहु महाराजांनी लिंगायत, जैन, मुस्लिम, मराठा, शिंपी , ख्रिस्ती , नाभीक अशा सर्व प्रकारच्या जनतेसाठी वसतिगृह व बोर्डिंग सुरू केली.शाहु महाराजांनी १९१८ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करायचा निर्णय घेतला. शाहु महाराजांनी १०० मराठा व धनगर विवाह लावले व हिंदु जैन मिश्र विवाह कायदा पण शाहु महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्रास अडिज हजार रुपये आर्थिक मदत दिली.

    ReplyDelete