Saturday, September 9, 2023

विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल: एक अन्वयार्थ


देशात होत असलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांची संभाव्य झुळूक असते असे म्हणता येत नाही. कारण या अगोदर झालेल्या पोटनिवडणुका व त्या नंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे निकाल उलट आले हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी जनमताचा कौल हा वेगळाच असतो. तो कोणाला कधी सत्तेतून घालवेल याचा नेम नसतो. कारण मतदार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्द्याबरोबरच तो धार्मिक व सामाजिक मुद्द्याचाही विचार करू लागला आहे. परंतु पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयातून सत्तेमध्ये नसलेल्या विरोधी पक्षाना गुदगुली व हर्ष वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. यातून विरोधी पक्षांमध्ये अधिक जोर लावून पुढील निवडणुका लढण्याचा हुरूप  येत असतो.

नुकत्याच ८ सप्टेंबरला घोषित झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल मिश्रित आले असले तरी पुढील विधानसभा व लोकसभांची दिशा ठरविणारे आहेत. सध्यातरी भाजपात्तर विरोधी पक्षांची एकजूट झालेली दिसते, त्या दृष्टीकोनातून संभाव्य भविष्यासंदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. सात विधानसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडदणुकामध्ये इंडिया या घटक पक्षाला एकूण  ४ तर भाजपाला ३ जागांवर विजय प्राप्त झालाय. या पोटनिवडणुकामध्ये भाजपाचा पराभव झालेला दिसत येत नसून त्यांनी आपल्या मागील ३ जागा कायम ठेवल्या आहेत. भाजपाला पश्चिम बंगाल मधील धूपगुरी मतदार संघात तृणमूल कॉंग्रेसकडून हार पत्करावी लागली असली तरी त्रिपुरातील बॉक्सनगर मतदार संघात त्याने मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाचा पराभव करीत विजय प्राप्त केला. तर उत्तराखंडमधील बागेश्वर व त्रिपुरातील धानपूर मतदारसंघ कायम राखला. कॉंग्रेसने केरळातील पुथुपल्ली व झारखंड मुक्ती मोर्चाने दुमरी हे मतदारसंघ आपल्याकडे कायम राखले आहेत. त्यामुळे हे निकाल सर्वासाठी समसमान असून केवळ मताच्या टक्केवारीमध्ये कमी अधिकपणा आलेला आहे. आणि हीच टक्केवारी  पुढे होणाऱ्या निवडणुकातील सूत्र ठरण्यास कारणीभूत ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील घोसी मतदार संघातून आलेला निकाल हा भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक तर इंडिया गठबंधनासाठी सुखकारक आहे. कारण घोशी मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपाच्या दलबदलू व मजबूत समजल्या गेलेल्या दारासिंह चौहान यांचा ४२,७५९ इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. दारासिंह चौहान यांची सामाजिक व राजकीय सुरुवात ही  बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे सोबत  झाली होती. बहुजन समाज पक्षाचा नेता व आमदार म्हणून ते परिचित होते. परंतु राजकीय महत्वाकांक्षेमुळे त्यांनी बसपा,सपा व भाजप असा दलबदल करीत घोसीमध्ये विद्यमान सपा पक्षाचा आमदार असतानाही  त्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीमध्ये दारासिंह चौहान यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे बोलघेवडेपणा असलेल्या ओ.पी.राजभर आणि  संजय निषाद यांनी घोसीमध्ये आपली प्रतिष्ठा पणास लावली होती. घोसीमध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवामुळे ओ.पी.राजभर, दारासिंह चौहान,संजय निषाद सारख्या दलबदलू नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला चाप तर बसलाच परंतु  यातून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व भाजपा पक्षाची उणीव व उत्तर प्रदेशच्या जनमानसाचा कौल अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसते.  

घोसी मतदार संघाचा निकाल बहुजन समाज पक्षालाही इशारा देणारा आहे. बसपा प्रमुख मायावतीनी घोसीमध्ये आपला उमेदवार न देता समर्थकांना नोटावर मदतान करण्यास सांगितले. परंतु बसपाला मागील २०२२ च्या निवडणुकीत मिळालेल्या २१.१२ टक्के समर्थक मतदारांनी त्याकडे पाठ फिरवून समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याचे विजयी मतसंख्येवरून दिसते. तर नोटास केवळ १७२८ इतके मतदान झाले. यांचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतीच्या एकला चलो रेया फार्मुल्यास झटका बसत असून बसपाच्या सध्याच्या १० खासदाराच्या संख्येत घट होवून पक्षाची शून्यावर बोळवण होवू शकते. म्हणून मायावतींनी आपल्या परंपरागत व्होटबँकेच्या बदललेल्या मानसिकतेचा व आजच्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या डावपेचात बदल करून घेतला पाहिजे. 

इंडिया गठबंधनाच्या घटक पक्षांनी मुख्यत:  कॉंग्रेस, आप, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना व डाव्या पक्षांनी जर २०२४ च्या लोकसभासाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकच उमेदवार दिल्यास पुढील लोकसभा निवडणुकात वेगळे चित्र बघायला मिळू शकेल. याची झलक घोसी मतदार संघात भाजपाच्या उमेदवारास आताच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या ३७.५४ टक्केवारीच्या तुलनेत समाजवादी पक्षास मिळालेल्या ५७.१९ टक्केवारीवरून दिसून येते. असे असले तरी भाजपाला २०२२ च्या निवडणुकीत मिळालेली ३३.५७ टक्के  मतसंख्या आणि २०२३ च्या (३७.५४ टक्के) टक्केवारीची तुलना केल्यास भाजपाच्या व्होटबँकेत ३.९७ टक्के मतांची वाढ झालेली आहे. तर उत्तराखंड मधील बागेश्वर मतदार संघात कॉंग्रेसला सन २०२२ (३४.५४ टक्के) च्या तुलनेत २०२३ (४५.९६ टक्के) मध्ये मिळालेल्या टक्केवारीत ११.४६ टक्क्याची भरघोस वाढ झाली असली तरीही कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला कारण भारतीय जनता पक्षाच्या एकूण टक्केवारीमध्ये मागील निवडणुकीत  मिळालेल्या टक्केवारी पेक्षा ३.१९ टक्क्याची परत वाढ झाली आहे. एकूणच या निवडणूक आकड्यावरून भाजपाच्या मतसंख्येत कमतरता न येता ती वाढत असल्याचे लक्षात येते. हा विस्कटीत विरोधी पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. 

यावरून विरोधी पक्षांनी युती न करता  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस सामोरे गेल्यास त्यांना पराभवास सामोरे अटळ असून परत भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येईल. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे पुढे देशात निवडणुका होण्याची शक्यताच नष्ट होईल कि काय! या भीतीचे  सावट नंतरच्या काळात कसोटीवर खरे उतरेल कि नाही याची स्पष्टता अधिक उघड होईल. परंतु त्यापेक्षा विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकास एक उमेदवार न दिल्यास उत्तराखंड मधील बागेश्वर मतदार संघासारखी परिस्थिती सगळीकडे निर्माण होवू शकते, याचे भान इंडिया गठबंधनाच्या सर्व घटक पक्षांनी लक्षात घ्यावयास हवे. हाच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालातून अन्वयार्थ निघतो. 

बापू राऊत 

लेखक व विश्लेषक 

९२२४३४३४६४

bapumraut@gmail.com  

 

2 comments:

  1. सत्ताधारी भाजपा व इंडिया गटबंधन यांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा व सर्वांचे डोळे उघडणारा हा लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद साहेब

      Delete