Friday, May 18, 2012

सर्वांचे हित हाच समाजव्यवस्थेचा पाया

ज्ञान आणि क्रांती यांचा अन्योन्यसंबंध आहे. आजूबाजूचं विश्‍व जर प्रचंड वेगाने बदलत असेल, तर त्याचे कारण ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील क्रांतीच होय; परंतु क्रांती म्हणजे काय?, हा प्रश्‍न नेहमी अनुत्तरितच असतो. क्रांतीचा संबंध सत्तापरिवर्तनापेक्षा मूल्य परिवर्तनाकडेच असतो. सामाजिक क्रांतीचा संबंध सामाजिक न्यायाशी म्हणजेच सत्ता आणि संपत्तीच्या समान वाटपाशी असतो. माणसाला सर्व प्रकारच्या शोषणांपासून मुक्त व भयमुक्त करणे, हे तिचे अंतिम ध्येय असते. ती सर्वव्यापी असते. एका फ्रेंच राज्यक्रांतीनंतर अशा प्रकारची क्रांती झाली नाही. रशियन क्रांतीनंतर माणूस गरजामुक्त झाला असेल; परंतु भयमुक्त झाला नाही. सामाजिक न्यायाची कल्पना ऍरिस्टॉटलपासून जॉन राल्सपर्यंत उत्क्रांत झाली आहे. प्लेटोने न्यायाची व्याख्या केली आहे, की प्रत्येकाने आपापले काम करावे किंवा कुणी कुणाच्या कामात हस्तक्षेप करू नये. माणसाच्या इच्छा चांगल्या किंवा वाईट असतात; परंतु त्या चांगल्या किंवा वाईट हे सुस्पष्टपणे ठरल्याशिवाय न्याय अथवा अन्याय यांचा बोध होणार नाही, असे सॉक्रेटिसने म्हटले आहे. बर्ट्रांड रसेलने चांगले आणि वाईट यातील सीमारेषा स्पष्ट करताना लिहिले आहे, की परस्परविरोधी (Conflicting Interests) इच्छांचे समायोजन करणे म्हणजेच न्यायाकडे जाणे होय.
व्यक्ती आणि समाज यांच्या हेतूंमध्ये संघर्ष असतो. त्यांचे हित परस्परविरोधी असते. त्यांच्यात समेळ (Harmony) असल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. या परस्परविरोधी हिताच्या संघर्षामुळेच युद्धे निर्माण होतात. म्हणून चांगले आणि वाईट तेव्हाच ठरेल जेव्हा सर्वांचेच हित साधले जाईल व कुणाचेही नुकसान होणार नाही. सर्वांचे हित (Common End) हाच समाजव्यवस्थेचा पाया असतो. बर्ट्रांड रसेल, जॉन ड्युवे, हेरोल्ड लास्की, बेबर पती-पत्नी, एडवर्ड कॅनन, अशा जगद्विख्यात विचारवंतांचा सहवास डॉ. आंबेडकरांना लाभला. युरोपियन उदारमतवाद, फ्रेंच राज्यक्रांतीतून उसळून वर आलेले स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्यायाधिष्ठित क्रांतिनिष्ठ विचारधन डिडेरो, कार्लाइल, व्हाल्टेअर, डॉ. जॉन्सन, नेपोलियन, मार्क्‍स आदी दिग्गजांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. जहाल विचारसरणीचा प्रभाव डॉ. आंबेडकरांवर असला, तरी त्यांचे ध्येय अधिक विशाल होते. ते मूलतः हाडाचे लोकशाहीवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी असल्यामुळे कुठल्याही स्वरूपातल्या हुकूमशाहीचा त्यांनी कडाडून विरोध केला. कुठल्याही परिवर्तनासाठी संघर्ष आवश्‍यक असला, तरी रक्त न सांडता बदल घडविता येणे शक्‍य आहे. याबाबतीत त्यांनी बुद्धालाच आदर्श मानले, ते त्या तत्कालीन बदलापलीकडील सर्वोच्च मानवी ध्येयांचा विचार करूनच. त्यांचा राष्ट्रवाद विशाल मानवतेवर आधारित होता म्हणून आधुनिक विचारवंतांत सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांचं अत्यंत सखोल चिंतन कुणी केले असेल, तर ते डॉ. आंबेडकरांनीच. महान माणसे अशा सत्याच्या शोधात असतात जे माणसाला अमानुष व्यवस्थेपासून मुक्त करील. डॉ. आंबेडकर अशा सत्याच्या शोधात होते. 

ज्ञानाची क्रांती ती हीच. युगानुयुगे माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्यात आमूलाग्र परिवर्तन होणे म्हणजेच क्रांती होय. आपल्या सांस्कृतिक परंपरा, धर्म आणि नीतिव्यवस्था, आपल्या जीवनाचे मापदंड, आदर्श, यात मूलग्राही परिवर्तन होणे आवश्‍यक असते. म्हणून बदल हवा तो आपल्या चेतनेत, अंतर्जाणिवेत. आपण जगाकडे कशा पद्धतीने पाहतो, याची चर्चा करणे आणि त्याप्रमाणे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होणे व त्याचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक जीवनात दिसणे व अनुभवास येणे म्हणजे परिवर्तन होय. आपणच निर्माण केलेल्या तुरुंगातून मुक्त होणे म्हणजेच क्रांती होय. असे परिवर्तनच ज्ञानाधिष्ठित असल्याने ते समाजाचा, व्यक्तीचा, राष्ट्राचा निरंतर विकास घडवून आणते
                          लेखक: श्री बी. जी. वाघ (दै. सकाल मधून)

No comments:

Post a Comment