Friday, December 26, 2014

घरवापसी कोणाची: मूळनिवासींची कि विदेशींयांची?

भारतामध्ये जेव्हापासून राजकीय सत्ताबदल झाला तेव्हापासून उघडपणे धर्मांतर करण्याचे धाडसत्र सुरु झाले. संघ व त्यांच्या विविध शाखा यांच्यात नवीन उर्जा निर्माण झालेली दिसते. संघ आजपर्यंत दबा धरून गुप्तपणे बजरंग दल, विहिप व दुर्गावाहिनी यांच्यासारख्या अनेक संघटनामार्फत आक्रमकपणे हिंदुत्वाच्या पडद्यामागून सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाचे काम करायचा. चुलीवर झाकण ठेवलेल्या गरम पातेल्यातील पाण्याची वाफ जशी आतमध्येच खवळत गुदमुरत असते, बाहेर येण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो. परंतु पातेल्याचे झाकण उघडताच त्याची वाफ भपकन बाहेर येवून भाजून काढते. काहीसे तसेच  संघाच्या
बाबतीमध्ये झाले आहे. भाजपा सत्तेमध्ये येताच दबा धरून बसलेला संघ एकदम आक्रमक झाला. कोणाला खावू, कोणाचे किती मुडते पाडू? अशी संघाची अवस्था झाली आहे. या देशातील दलित, मागासवर्गीय व बौध्द यांना कधीही निपटता येईल परंतु प्रथम मोठ्या माशांना टिपले पाहिजे, या मानसिकतेतून त्यांनी मुस्लीम व इसाई यांना आपले भक्ष्य केले आहे. यासाठी प्रथम लवजिहाद या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली. त्यातून पोषक वातावरण निर्माण होताच धर्मांतरणाचा विषय ऐरणीवर आणला. बांगला देशीय निर्वासित मुस्लिमांना विविध प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतरण करवून घेतले. त्यावर देशात टीकेची झोड उठताच व राज्यसभा ठप्प होताच त्याला “घरवापसी” असे गोंडस नाव देण्यात आले. असे शब्द वापरल्यास प्रसारमाध्यमात व लोकात सहानुभूती मिळते हे समजण्यास संघाचा हातखंड आहे. आता मोहन भागवत म्हणू लागले “ये सब मेरा माल है, मै मेरे माल को अपने घर लेके जा रहा हु, इसके लिये मुझे जो जो करणा पडेगा वो मै करुंगा”. भारतातील समस्त मुस्लीम व इसाईना ते आपला माल समजत आहेत. यावरून संघाची विचारसरणी किती उच्च कोटीची आहे? याचा प्रत्यय येतो.
मुख्यत्वे धर्मांतराचे तीन प्रकार पाडता येतात. एक जबरदस्तीचे, दुसरे परतफेडीच्या स्वरुपात स्वच्छेने केलेले तर तिसरे म्हणजे  अन्याय/अत्याचार व गुलामी टाळण्यासाठी स्वत:हून निवडलेल्या नवजीवनाचा पर्याय. भारतात मोगलांनी जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा जो कांगावा केल्या जातो त्यात तथ्यांश आढळत नाही. मोगलांच्या काळात धर्म स्वीकारण्याच्या बदल्यात वतनदा-या, जहागीरदारी मिळायच्या त्यामुळे स्वत:हून लालचेने राजे व सरदार मुसलमान होत असत. तर दुस-या बाजूला ब्राम्हणाच्या सनातनी धर्माचा जातीयवाद, शिवाशिवीला कंटाळून, अपमान व अवहेलना पासून सुटका करून घेण्यासाठी खालच्या जातींनी मुसलमान धर्म स्वीकारल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. मुसलमानासोबत युध्द करताना हिंदू सैनिक धर्मशास्त्राच्या शिक्षेच्या भयाने मुसलमानाच्या सैन्यात घुसून युध्द करीत नसत कारण मुसलमान सैनिकाचा स्पर्श झाल्यास धर्मबहिष्कृत जीवन जगावे लागत असायचे. एवढेच कशाला वरच्या जातीच्या हिंदू सैनिकांना खालच्या अस्पृश्य हिंदू जातीच्या सैनिकाचा स्पर्श झाला तरी त्यांना धर्म व जातीबाहेर काढण्यात येत असे. शुध्दीकरणासाठी कठोर शिक्षेला सामोरे जावे लागत असे.त्यामुळे अशा अनेक हजारो हिंदू सैनिकानी मुस्लीम धर्म स्वीकारला. कारण त्या धर्मात अस्पृश्यता व शिवाशिवी नव्हती. याला बळजबरीचे धर्मांतर कसे म्हणणार?. भारतीय लोक इतिहास न वाचता केवळ काल्पनिक अशा पौराणिक कथा वाचीत असतात. त्यामुळे त्यांना वास्तव इतिहासाची माहिती मिळणे दुरापास्तच झाले आहे.
धर्मांतराचा इतिहासच बघितला तर मोगलांच्या काळातील परिस्थितीपेक्षा ब्राम्हण राजा पुष्यमित्र शुंग यांच्या काळात झालेले धर्मांतर हे फारच जुलमी व छळवादी होते. पुष्यमित्र शुंगाने बौध्द भिक्षुकाचे शीर कलम करून आणना-यांना बक्षिसे जाहीर केली होती. त्याकाळात ब्राम्हण सोडले बहुंसंख्य जनता ही बौध्द धर्मीय होती. परंतु पुष्यमित्र शुंग व राजा शशांक यांच्या धास्तीमुळे जनता आम्ही बौद्ध नसल्याचा देखावा करीत होती. आणि त्यानंतरच्या पिढ्या आपले संपूर्ण बौद्धपण विसरून गेल्या. तर परतफेडीच्या स्वरुपात  स्वच्छेने केलेल्या धर्मांतराचा काळ हा ब्रिटीश काळ होय. या काळात चर्च मिशनरीनी हिंदू धर्मशास्त्रानुसार   या देशातील मागासवर्गीय, पददलीत व आदिवासी यांचेवर होणारे अत्याचार, त्यांची गरिबी व  अशिक्षितपणा व वेगळेपणा बघितला. चर्चचा हेतू धर्म वाढविण्याचा असला तरी त्यांनी या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, मोफत शिक्षण दिले, आर्थिक संसाधन प्राप्त करून दिलीत त्याहीपेक्षा सर्व लोक समान असून ती सारी देवाची लेकरे आहेत अशी शिकवण देवून चर्चच्या प्रार्थनेत सगळ्यांना सहभागी करून घेतले. याचा परिणाम म्हणून ख्रिश्चन धर्म व मिशनरी लोक इतरापेक्षा त्यांना जवळचे वाटू लागले म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारला. धर्मांतरापेक्षा या गरिबांना त्यांनी जगविले, माणूसपण देवून माणसात आणले हे महत्वाचे नाही काय? अशिक्षित लोकांनीच नव्हे तर पंडिता रमाबाई व रेव्हरंड टिळक या सारख्यांना आपल्या मुळच्या ब्राम्हणी धर्माची तत्वे ख्रिस्ती धर्मापेक्षा दुय्यम वाटली व त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
तिसरा धर्मांतराचा प्रकार हा महत्वाचा आहे. कारण तीस-या धर्मांतरासारखे धर्मांतर या देशात पुन्हा घडू नये यासाठीच धर्मांतराच्या कायद्याचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला आहे. या देशात अनेक कष्टकरी जातीना कित्येक शतके अपमानाची, तुच्छतेची व वेळप्रसंगी जनावरापेक्षाही तुच्छतेची वागणूक देण्यात आली. गुलामासारखे जीवन जगण्यास विवश करण्यात आले होते. या लोकांनी योग्य नेता मिळेपर्यंत अपमान सहन केला. नेता मिळताच त्यांनी धर्मशास्त्रे व समाजव्यवस्था विरोधी बंड करने सुरु केले. त्याचीच परिणीती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली जगातील सर्वात मोठे धर्मांतर घडवून आणले. आंबेडकरांच्या या धर्मांतरामागे लालूच वा प्रलोभन होते का? हे तथाकथीत लोकांनी तपासून पहावे. आत्मसन्मानाचा मार्ग म्हणून, होणारी अवहेलना थांबविण्यासाठी एक कर्मकांडमुक्त विज्ञानवादी बौद्ध धर्म येथील कष्टक-यांना दिला. आंबेडकरांनी हे धर्मांतर राजकीय फायद्यासाठी, संख्याबळाच्या हिशेबासाठी व देवाणघेवाणीसाठी केल नाही. तसे असते त्यांनी मुस्लीम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता. असे असतानाही हा देश आंबेडकरांना सन्मान देत नाही. याचे कारण म्हणजे मनुस्मृती ऐवजी त्यांनी दिलेली मानवतावादी राज्यघटना होय.
वरील तीन प्रकारच्या धर्मांतरात घर वापसीचा प्रश्न येतोच कुठे? ज्या कारणासाठी धर्मांतरे झालीत ती कारणे आजही संपली नाहीत. ज्यांनी धर्मांतरे केलीत त्यांनी आपल्या देशाला, देशाच्या सार्वभौमत्वाला, इथल्या संस्कृतीला, राज्यघटनेला आव्हान दिले आहे काय? ते इथल्या मातीशी एकरूप आहेत कारण ते  या मातीतलेच मूळनिवासी आहेत. देशाच्या रक्षणासाठी ते कधीही तत्पर आहेत. उलट या देशात काही समाजघटक हे स्वत:ला असुरक्षित समजतात. तेच घटक या देशात दंगली घडवून आणताना दिसतात. संस्कृती, गर्व से कहो, मंदिर वही बनायेंगे, धार्मिक शिक्षण व दुस-या धर्माच्या अस्मिता पुसणे या गोंडस नावाखाली देश सतत अस्थिर ठेवू पहात आहेत.
या देशात ब्रिटीश, पोर्तुगीज, डच, अफगाण आले. त्यांनी भारताच्या विविध भागात आपापली राज्ये निर्माण केलीत. परदेशातून मुठभर आलेल्या लोकांनी या देशावर शेकडो वर्ष का राज्य केल? याच्या खोलात कोणीच जावू बघत नाहीत. फ्रेंच राज्यक्रांती व ब्रिटनमधील उदारमतवाद व युरोपात झालेले सामाजिक व राजकीय बदल हे भारतातील स्वातंत्र्याच्या चळवळीस ठरलेली पोषक घटके होत. भारतात झालेल्या उठावामुळे बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपली सत्ता येथील लोकाकडे सुपर्द करून आपल्या स्वत:च्या देशात पलायन केले याला “घरवापसी” म्हणतात. संघाची घरवापसीची व्याख्या ही संकुचित व उन्माद निर्माण करणारी आहे. याउलट या देशात “घरवापसी” न झालेला झालेला मोठा  घटक हजर आहे. हजारो वर्षापासून तो या देशात दबा धरून बसलेला आहे. तो स्वत:ची घरवापसी न बघता दुस-याची घरवापसी करायला लागला आहे. या देशात हजारो वर्षापूर्वी युरेशियातून खैबरखिंडीच्या मार्गे भारतात युरेशियन आर्यांनी घुसखोरी केली. लोकमान्य  टिळकासार्ख्यां अनेक विचारवंतानी त्याची पुष्टी केली आहे. मग एक प्रश्न पडतो? या देशात बाहेरून आलेले ब्रिटीश, पोर्तुगीज, डच, अफगानाणी आपल्या देशात घरवापसी केली तर मग या आर्यांनी आपापल्या मुळच्या युरेशियन देशात घरवापसी का केली नाही? की यांनी फक्त दुस-यांना घरवापसीचे सल्ले द्यायचे? तेही या देशातील मूळनिवासी लोकांना? कोणत्या तत्वात याचा समावेश होतो? हे संघाने या देशातील बहुजन समाजाला सांगितले पाहिजे अन्यथा एक दिवस बहुजन समाजच युरेशियन आर्यांना देशाबाहेर हाकलून त्यांची घरवापसी घडवून आणेल. आणि तो दिवस फार दुरचा नसणार!
धर्मांतराच्या कार्यक्रमात एक बाब प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे धर्मांतराचे नियोजन, आयोजन व संयोजन करण्यात तसेच त्या त्या एरियामध्ये जावून मुस्लीम व ख्रिस्ती जनतेला पटविण्यात मुख्यत: मागासवर्गीय व खालच्या जातीतील लोकांचा सहभाग दिसतो. पोलीस केसेस लागल्या तर त्या तुमच्यावर लागतील, तुरुंगात जावे लागले तर तुम्ही जा. आम्ही मात्र नामनिराळे परंतु काम आमचेच झाले पाहिजे ही संघाची व्ह्युनिती आहे. म्हणूनच साध्वी निरंजन, उमा भारती, साक्षी महाराज व नंदकिशोर वाल्मिकी यासारख्या खालच्या जातीतील लोकांना साधू व साध्वी बनवून त्यांचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे.
आदर्श समाजरचनेत विभिन्न गट एकमेकाच्या सुखदू:खात सहभागी होत असतात, यालाच सामाजिक एकात्मकता म्हणतात. लोकशाही म्हणजे प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था. हिंदूची धर्मशास्त्रे मात्र अशा समाजव्यवस्थेला मान्यता देत नाही. कारण धर्म सनातन असून त्यात परिवर्तन अपेक्षित नसते. घटनेने प्रत्येकाला नवजीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु नवजीवन मृत शरीरात निर्माण करता येत नाही. नवीन शरीरातच ते शक्य असते. त्यासाठी प्रथम जुन्या शरीराची कात टाकून नवीन शरीर धारण केले पाहिजे. म्हणजेच परंपरावादी धर्मशास्त्राचा त्याग व नाश करूनच नवजीवन प्राप्त करता येते. असे नवजीवन संघ धर्मांतरित मुस्लिमांना व ख्रिस्तीना प्राप्त करून देणार आहे का? या बांगलादेशी मुसलमानांना हिंदू धर्माच्या कोणत्या जातीमध्ये टाकणार? प्रत्येकाला उच्च दर्जाची जात हवी असते. भारतात ब्राम्हणाशिवाय दुसरी कोणतीही उच्च जात होवू शकत नाही. त्यामुळे त्यांना ब्राम्हण या जातीमध्ये टाकण्यात यावे. त्यांची ब्राम्हणाप्रमाने मुंज करण्यात येवून गळ्यात धागे घालून पूजा करण्याचा पाठ शिकविण्यात यावा. जेणेकरून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ असे करणार आहे का?. असे झाले तर भारतातील सगळ्या जातीना ब्राम्हण करून जातीसंस्थेचे उच्चाटन करता येईल.
बापू राऊत
९२२४३४३४६४

4 comments: