Sunday, September 8, 2024

टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?


 भारत हा देव व धर्माचा देश आहे, भारतात ३२ कोटी देव असल्याचा दावा काही दैववादी लोक करीत असतात. त्यासाठी वैदिक साहित्याचे दाखले देण्यात येतात. ज्या काळात या देशाची एकूण लोकसंख्या ३२ कोटी नव्हती, त्या काळात येथे ३२ कोटी देव वावरत होते. तरीही भारत गुलामीच्या व आक्रमणकर्त्यांच्या छायेत वावरत होता. जनतेने आपले रक्त सांडवून आक्रमणकर्त्यांना हरवून त्यांना पळवून लावले. त्यावेळेस देव काय करीत होते ? त्यांचे कार्य काय, केवळ मंदिरात निर्जीव पडून राहण्याचे होते? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. यातून दुसरा एक प्रश्न निर्माण  होतो, तो म्हणजे देवाची निर्मिती  चतुर लोकांनी आपल्या फायद्यासाठी केली तर नाही ना !  देशात असलेली विषमता, मंदिरात होणाऱ्या चोऱ्या, मंदिरात पुजार्याकडून होत असलेले बलात्कार, त्यांच्याकडून होणारी भक्तांची फसवणूक,  देवांच्या कार्यक्रमात होणारी चेंगराचेंगरी व मृत्यू, मंदिरात पूजा केल्यानानंतर प्रवासात होणारे अपघात. हे सारे बघितले कि, एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होते, ते म्हणजे देव व मंदिर नावाचा बागुलबुवा हा  षडयंत्रकारी, चतुर, भीती दाखविणारी  टोळी व स्वत:ला सर्वश्रेष्ठ बनविण्याचा कार्यकलाप करणाऱ्या स्वार्थी चरांनी उभा केल्याचे स्पष्ट सिद्ध होते. आजतागायत हे स्वार्थी गौडबंगाल सुरूच असून अनेकजन त्यास बळी जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे “ जे लोक बळी पडत आहेत, ते याबाबत तसूभरही  विचार करण्यास तयार नाहीत”. त्यामुळे फसवेगिरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Sunday, August 25, 2024

पेशवाईचे पतन: हिंदुच्या मुक्तीसाठी खुले झालेले द्वार!


ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा शेवटचा टप्पा होता.

Saturday, July 20, 2024

तामिळनाडूतील दलित अत्याचार व स्टॅलिन यांची संदिग्ध भूमिका

 


तामिळनाडू हे ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या विचाराचा वारसा लाभलेले राज्य. त्यांनी तमिळ जनतेला समतेची व धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यांच्याच विचाराचा आदर्श घेणारे डीएमके (द्रविड मुन्नेत्र कझडम) व एआयडीएमके (अण्णा द्रविड मुन्नेत्र कझडम) हे दोन्ही पक्ष नेहमीच राज्यातील सत्तेमध्ये असतात. त्यामुळे समतेचे व जाती निर्मुलनाचे लोन प्रत्येक तामिळी कुटुंबात पोहोचवयास हवे होते. परंतु तसे झालेले दिसत नसून हिंदू धर्मातील निम्न जातीवरील अत्याचार रोज पुढे येत आहेत. अशा घटनात सतत होणारी वाढ हि डीएमके पक्षप्रमुख एम के स्टालिन यांचे वक्तव्य व कृती यात तारतम्य जुळत नसल्याचे दिसते. त्यामुळे केवळ पुरोगामीपणाचा आव आणून सामाजिक सुधारणा करता येत नाही तर त्याला कृतीची जोड असणे आवश्यक असते. 

Sunday, July 7, 2024

के. चंद्रू यांचा शालेय जातीनिर्मुलन अहवाल काय सांगतो ?

 


भारत हा “जाती आधारित देश” आहे या सत्य वचनाला कोणीही नाकारू शकत नाही. जाती आधारित व्यवस्थेमुळे हजारो वर्षापासून भारतातील बहुसंख्य समाजाचे शोषण आजही सुरु आहे. जाती आधारित शोषणाचा प्रश्न हा सर्व राज्यातील सरकारी शाळा असो वा  खाजगी जाती आधारित शोषण होतच असते. भारतातील तामिळनाडू राज्य हे त्यास अपवाद कसे असेल? जातीय भेदाभावाच्या अनेक घटना तेथे घडत असतात. हे लक्षात घेत एम के स्टालिन या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातून व विशेषता शैक्षणिक संस्थामधून जाती आधारित भेदभाव नष्ट करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी  सेवानिर्वूत्त न्यायमूर्ती के. चंद्रु यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडे  शिक्षणाच्या  समान संधी, शालेय वातावरण, प्रशासकीय सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रमातील बदल आणि विद्यार्थी आचार नियम यावर अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. या समितीने १८.०६.२०२४ रोजी  तामिळनाडू सरकारकडे सदर रिपोर्ट सादर केलाय. 

Friday, June 21, 2024

आगामी विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निकालाचे परिणाम काय होतील !

 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकाचे निकाल हे राजकीय पंडित व प्रसार माध्यमानी उत्तरोत्तर एक्झिट पोल मध्ये दाखविलेल्या अंदाजाला खरे उतरले नाही. निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सुध्दा  महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांना सारख्याच जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. परंतु तसेही न होता भाजपाला केवळ ९ जागा दिलेल्या निकालाने सरकार समर्थित सर्वेक्षणाचे पोल उघडकीस आले. खरे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या पक्ष फोडीमुळे सत्ताधारी पक्षाविरोधात सुप्त रोष होता. पक्ष फोडणाऱ्या व पक्षातून फुटून निघणाऱ्या आमदारांनी मतदाराशी केलेल्या विश्वासघाताची शिक्षा मतपेटीतून व्यक्त झाली. त्यामुळे निवडणूक आयोग व केंद्र सरकारने पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करून पक्षांतर करणार्यांना परत लोकांचा कौल घेण्यास भाग पाडले पाहिजे. फोडाफोडीच्या प्रकरणाचा मोठा फटका भाजप प्रणीत महायुतीला बसणार, याची जाणीव भाजपाला झाली होती. म्हणून हा फटका कमी करण्यासाठी राज ठाकरे यांना महायुतीकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षांना मिळालेल्या निवडणूक चिन्हासारखेच दुसरे चिन्ह निवडणूक पत्रिकेवर आणून मतदारामध्ये संभ्रम होईल अशी चाल आखली गेली. नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत शेवटपर्यंत जागा संदर्भात चर्चा करतील व विशिष्ठ क्षणी ते एकला चलो चा निर्णय जाहीर करतील याची जाणीव सुध्दा भाजप नेत्यांना असावी. या तजविजीमुळे  महाराष्ट्रात फारसे नुकसान होणार नाही असा विश्वास ४०० पार च्या  नाऱ्यात झळकत होता.

Tuesday, June 11, 2024

बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल!


देशात नुकतीच २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये एक प्रकर्षाने जाणवले कि फुलेआंबेडकरी विचारधारेचे पक्ष म्हणविणारे सारे पक्ष हे धाराशायी झाले आहेत. बहुजनवादी राजकीय पक्ष म्हटला तर त्यात मुख्यत: बहुजन समाज पक्षाचा समावेश होतो तर प्रादेशिक स्तरावर वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांचे नाव घेता येईल. परंतु  राष्ट्रीय जनता दल व समाजवादी पक्ष  या पक्षांना फुले शाहू आंबेडकर विचारधारेतील पक्ष म्हणता येत नाही. रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष होता. या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून बहुजनांना राजकीय सत्ताधारी बनविण्याची त्यांची योजना होती परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्च्यात या पक्षाची अनेक शकले झाली. आजच्या स्थितीमध्ये तो विविध गटात विभाजित होवून अस्तित्वहीन झालाय. निवडणूक न लढता मंत्री होणारे रामदास आठवले हे केवळ निवडणूक प्यादे असून ते नगरसेवक म्हणून तरी निवडून येतील का? हा एक प्रश्नच आहे. कांशीराम यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून प्रेरणा घेवून बामसेफ हि सामाजिक संघटना व बहुजन समाज पक्ष स्थापन केला. त्यांनी देशातील बहुजन जनतेला जागृत करीत निवडणुकांच्या माध्यमातून अनेक राज्यात बसपाचे आमदार व खासदार निवडून आणले. तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बहुजन पक्षाची सत्ता स्थापण्यात यश मिळविले. बाबासाहेबांचे विचार व त्यावर कांशीराम यांचेकडून करण्यात आलेली अंमलबजावणी हा आता इतिहासाचा भाग झालाय. 

Tuesday, May 28, 2024

बदलता अभ्यासक्रम बदलती मानसिकता

 


देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यानुसार राज्याच्या शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी पर्यंतच्या अभ्यासप्रणालीत काही बदल केले असून नव्या आराखड्यासंदर्भात नागरिकाकडून काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रारूप बघितल्यास त्यात धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव याचा अभाव दिसून येतो तर दुसऱ्या बाजूने त्या त्या राज्यातील मातृभाषा व स्थानिक भाषेला प्राधान्य देत असताना इंग्रजीला ऐच्छिक सदरात टाकण्यात आले. किमान ५ व्या व आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा ठेवण्यात आली. परंतु ९ वी ते १२ पर्यंत कोणते माध्यम असावे यावर संदिग्धता कायम आहे. इंग्रजीला निकडीची भाषा न करता ऐच्छिक करणे हे भाषा क्षेत्रात विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर व त्यांची क्षमता अधिक संकुचित करणारी ठरू शकते.  

Wednesday, May 22, 2024

बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू

 

तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक, अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.

Wednesday, May 15, 2024

चाणक्य : तो, मी नव्हेच !

 

भारतीय जनतेच्या मनात चाणक्य या व्यक्तीरेखेविषयी अनेक कांगोरे कोरले गेले आहेत. “अर्थशास्त्र” या पुस्तकाचे लेखक म्हणून चाणक्य (कौटिल्य) यांचेकडे बघितल्या जाते. हा ग्रंथ अर्थकारणापेक्षा  राजकारण व प्रशासन यावर अधिक भाष्य करते. भारतात उपद्रवी मूल्यांना चाणक्यनीती संबोधण्याची परंपरा असून उपद्रवी व्यक्तिला चाणक्याची उपमा दिली जाते. कुणाचा कसा गेम करायचा यावर हि नीती (साम,दाम,दंड,भेद) अधिक भर देते. चाणक्य हे महान रणनीतीकार होते अशा स्वरूपाच्या कथा कादंबरी व नाटकातून प्रस्तुत केल्या जातात.

Tuesday, April 9, 2024

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

 


स्वातंत्र्यपूर्व काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते. प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे  लोक राहत होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही. 

Monday, March 25, 2024

महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांची आकडेवारी काय निर्देश देते ?

देशात निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणुक हि एकूण पाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकांच्या घोषणाबरोबरच विविध पक्ष व गठबंधन यांच्यात मतदार संघासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत: दोन निवडणूक आघाड्या दिसतात. त्यापैकी एक शरद पवार -उद्धव ठाकरे प्रणीत महाविकास आघाडी असून दुसरी भाजपाप्रणीत महायुती..यात एक तिसरा  महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे सध्यातरी स्वत: निवडून न येता एकाला जिंकवून देणारा तर दुसऱ्याला हरविणारा. बहुजन वंचित आघाडी (बविआ) हा तो घटक होय. मागच्या निवडणुकाप्रमाणेच यावर्षीच्या  निवडणुकामध्ये बविआ हाच महत्वाचा घटक ठरू शकतो. बहुजन वंचित आघाडीची  ठाकरे -पवार आघाडी सोबत युती होवू नये. यासाठी अदृश्य खेळ व वाटाघाटी चालू असणे हे राजकारणात नवे असे काही नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा वंचितला किती जागा द्यायच्या हा घोळ असून त्यांना स्वत:चेच मतदारसंघ वाटप करण्यात अडचणी येत असून महायुतीला सुध्दा त्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.   

Monday, February 26, 2024

ओबीसी आरक्षणात मराठा भागीदारीची मागणी कितपत योग्य ?


गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनीएक मराठा लाख मराठाया नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या १० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच  मराठ्यांची भागीदारी व सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.

Saturday, January 27, 2024

शिवधर्माच्या यशस्वीतेचे काय झाले ?

 


१२ जानेवारी २००५ रोजी, सिंदखेडराजा येथे असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म या नव्या धर्माची स्थापना करण्यात आली होती. शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जीजाबाईना प्रेरणास्त्रोत मानून मानवतेची मुल्ये व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि महिलांचा आदर करणार्या या शिवधर्माचे प्रकटन प्रातिनिधिक स्वरूपात होत असल्याचे सांगून या धर्माची संहिता सुध्दा असेल असे डॉ. आ.ह.साळुंखे व मा.पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केले होते. शिवधर्माच्या स्थापनेत श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा पुढाकार होता. तर डॉ. आ.ह.साळुंखे यांचे या शिवधर्मास अध्ययनशील अधिष्ठान लाभले होते. या धर्माची भूमिका सार्वजनिक हिताची व विधायक राहण्याची ग्वाही साळुंखे उपस्थित जमावास दिली होती. शिवाय “हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांच्या काळजावर विखारी घाव घातले गेले. त्यांना ते समजले नाही. तरीही तोच आमचा धर्म असे ते समजत राहिले. आता धर्माचा अर्थ कळू लागला आहे. म्हणून संताप वाढतो आहे. परंतु या संतापाच्या उर्जेचा वापर नवनिर्मितीसाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवधर्म स्थापनेच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. शिवधर्मास आता १९ वर्ष पूर्ण होत आहेत. या १९ वर्षात शिवधर्म किती वाढला व त्यास धर्माचे स्वरूप प्राप्त होवून विधिवत कार्य होत आहेत का, लोक अधिकाधिक स्वरूपात धर्म बदल करून शिवधर्म स्वीकारताहेत का? या धर्माच्या   निर्मितीचे फलित काय?  या दृष्टीकोनातून धर्म स्थापनेच्या घटनेचे विवेचन व्हावयास हवे.

Monday, January 15, 2024

श्रीलंकेतील प्रसिध्द पर्यटन स्थान सिगिरिया व कल्पित पुर्वाग्रह


काही प्रसारमाध्यमे व युट्युबर श्रीलंकेच्या जगप्रसिध्द सिगिरिया या ऐतिहासिक पुरातत्व स्थानाचे विविध व्हिडिओच्या माध्यमातुन रावणाची राजधानी म्हणून प्रचार करीत असल्याचे दिसते. काही प्रसारमाध्यमे आवेशपूर्ण विधाने करून सत्य वस्तुस्थिती पासून दूर नेत आहेत. काही गोष्टी आपल्या खास हातोटीने सांगण्याची कला काही लोकांना लाभलेली आहे. परंतु चांगले करण्याऐवजी ते या कलेचा काल्पनिक व खोट्या  गोष्टी सांगण्यात वापर करतात. त्यातूनच मग भारतीयांच्या मनात अधिक गूढता निर्माण करण्यात होते. याच प्रवृत्तींनी भारतीयांना वास्तव स्थिती व स्वतंत्र विचार करण्याच्या क्रियेपासून हजारो वर्षे दूर ठेवले. आजही भारतीयांना भ्रामक अशा काल्पनिक इतिहासात रममाण होण्यास मजबूर करण्यात येत आहे. त्यासाठी खास यंत्रणा व त्यांचे प्रवक्ते  हे काम हिरहिरीने करीत आहेत. 

सिगीरीयातील अदभूत स्मारक व तेथे असणारी उद्याने, जल तलाव, बगीचे यास ते रावणाची खास स्थाने असल्याचे दाखवितात. वास्तविकता श्रीलंका व  तेथील जनतेचा रावणाशी काहीच सबंध प्रस्थापित नाही. श्रीलंकेतील जनतेला रावणाविषयी माहिती विचारल्यास त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. श्रीलंकेतील कोणत्याही पौराणिक वा पुरातात्विक साहित्यात रावणाविषयी काहीही लिहिले गेले नाही. त्यामुळे रावण व त्यासबंधित पात्राचे ऐतिहासिक पुरावे व कालावधीची साक्ष कोठेही मिळत नाहीत.यावरून रामायणातील रावणकथा ह्या भारताच्या काही लोकांच्या सुपीक डोक्याची  उत्पत्ती आहे हे दृष्टीस पडते.

Tuesday, November 14, 2023

संस्कृत भाषा भारताच्या पाली प्राकृत पेक्षा जुनी कशी ठरेल?


भारताची मूळ भाषा कोणती? यावर बरेच वादविवाद झडत असतात. भारतात प्राकृत, द्रविड, मुंडा, संस्कृत आणि अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत. यापैकी मूळ भाषा कोणती? या वादामध्ये काही तथाकथित धर्मवादी व संघीय विचारधारेचे लोक संस्कृत हीच या देशाची मूळ भाषा असून इतर भाषांची निर्मिती संस्कृत पासून झाली असा सूर लावीत असतात. यामध्ये तथ्यात्मक पुराव्यावर लक्ष न देता भावनात्मक पुळका आणून आपल्या “इतिहासकार” या पेशासी इमान न राखणाऱ्या काही तथाकथित इतिहासकारांचा समावेश आहे. “आम्हाला पुराव्यांचे व तथ्यात्मक वस्तुस्थितीसी काही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तोच इतिहास, आम्ही जे म्हणतो तेच खरे” असे सांगणारा एक समूह भारतात आहे. वास्तविकता असे लोक ठग, भांड, षडयंत्रकारी, विभाजनकारी व  वर्चस्ववादी मनोवृत्तीचे असतात. त्यांच्यावर अनेक लोक विश्वास टाकून तेच सत्य आहे असे मानायला लागतात परंतु तो एक “असत्य व कुटनीतीचा”  मोठा ढिगारा असतो. यातून देशाचे समाजस्वास्थ्य बिघडण्याचे मोठे धोके असतात